अहमदनगर - जिल्ह्यातील राहुरी येथील २४ वर्षीय तरुण व राहता तालुक्यातील गोगलगाव येथील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. नापिकीला कंटाळून या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे दोन्ही गावातील लोकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
राहुरी येथील भारत बारकू गडदे (वय २४) तर राहता तालुक्यातील गोगलगाव येथील रविद्र लक्ष्मण मगर (वय ३०), असे मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. अवकाळी पावसामुळे राहुरी येथील भारत गडदे यांची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. शेतातील कांदे, कपाशी, या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच एल अँड टी या फायनान्स कंपनीचे कर्जाचे हफ्ते त्यांच्यावर थकीत असल्याने त्यांच्या ट्रक्टरचा लिलाव करण्यात आला. ट्रक्टरचा लिलाव केल्याने भारत गडदे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती त्यांच्या नेतवाईकांनी दिली आहे.
गोलगाव येथील रविंद्र मगर हे देखील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे वैफल्यग्रस्त होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ते आपल्या वृद्ध आईसोबत राहत होते. रविद्र यांना एक भाऊ आहे. दोघा भावात मिळून रविंद्र यांना गोगलगाव येथे अवघी तीन एकर शेतजमीन आहे. वेळेत पाऊस न झाल्याने त्यांच्या शेत जमिनीत पेरलेले व्यवस्थित उगवले नाही. जे उगवले ते सध्याच्या अतिवृष्टीमुळे पदरी पडले नाही. यामुळे रविंद्र निराश झाले होते. त्यातच दिवाळी सणाकरता कुटुंबासाठी आणि बहीण, भाच्यांना काहीच घेण्याची ऐपत नसल्याने ते तणावात होते. यातूनच गुरूवारी मध्यरात्री वृद्ध आई घरात झोपल्यानंतर रविंद्ररने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.
हेही वाचा- रोहित पवारांची जामखेडमध्ये भव्य मिरवणूक; 28 जेसीबींवरून उधळला गुलाल