ETV Bharat / state

Onion Prices Fell : कुणीही या अन् फुकट कांदे घेऊन जा; कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा

author img

By

Published : Feb 25, 2023, 5:42 PM IST

संगमनेर तालुक्यातील पिंपरने येथील धनंजय थोरात या शेतकऱ्यावर कांद्याचे दर घसरल्याने कांदा फुकटमध्ये देण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्याने चार एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी आतापर्यंत जवळपास 2 लाख रुपयांच्यावर त्याने खर्च केला होता. कांदा काढणीला आला असतानाच अचानक कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यावर ही नामुष्की ओढवली आहे.

Onion Prices Fell
कांद्याचे दर घसरले

शेतकऱ्यावर कांद्याचे दर घसरल्याने कांदा फुकटमध्ये देण्याची वेळ आली

अहमदनगर: गृहिणींच्या डोळ्यात सतत पाणी आणणारा कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. सध्या आवक वाढल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संगमनेर तालुक्यातील पिंपरने येथील धनंजय थोरात या शेतकऱ्यावर नामुष्कीची ओढावली आहे. या शेतकऱ्याने आपल्या चार एकर क्षेत्रात काढणीला आलेला कांदा भाव नसल्याने कोणीही या आणि मोफत कांदा उपटून घेऊन जा आणि रान मोकळे करून देण्याची साद घातली आहे. त्यामुळे शेतात कांद्याची पात खाण्यासाठी जनावरे, शेळ्या-मेंढ्या आणि कांदा नेण्यासाठी माणसांची झुंबड उडाली आहे. दोन दिवसात चार एकर कांदा संगमनेरमधील पिंपरणे, जोर्वे, कनोली आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी काढून नेला आहे.

कांद्याचे दर घसरले: संगमनेर तालुक्यातील पिंपरने येथील धनंजय थोरात या शेतकऱ्यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी आतापर्यंत जवळपास 2 लाख रुपयांच्यावर खर्च केला होता. कांदा काढणीला आला असतानाच अचानक कांद्याचे भाव कोसळले. आपल्या कांद्याला मिळत असलेल्या अल्प दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला भाव नसल्याने शेतकरी शेतातील कांद्याची काढणी करण्याचे टाळत आहे. पाच ते सहा रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. लागवडीचा खर्चही हाती पडत नसून शेतकरी हतबल झाले आहे. गाडी खर्च, हमाल खर्च, तोलाई आडत यांच्या खर्च खिशातून देण्याची शेतकऱ्यावर आली आहे.

शेतकरी संकटात: अतिवृष्टी आणि अवकाळीच्या अस्मानी संकटातुन बाहेर पडत नाही. तोपर्यंत बळीराजा महावितरणाच्या लोडशेडिंग आणि खतांच्या दरवाढीच्या सुलतानी संकटात सापडला. अन् या संकटाशी सामना करत रात्रंदिवस मेहनत करूनही हाती आलेल्या पिकाला कवडीमोल भाव भेटत आहे. यामुळे शेतकऱ्यांना लावलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. याकडे सरकारने लक्ष देऊन सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


सरकारची भूमिका महत्वाची: भाव चांगला म्हणून लावला. पण फसलो गतवर्षी कांदा उत्पादनातून अनेक शेतकऱ्यांना चांगला फायदा झाल्याने, यंदा कांद्याची लागवड केली होती. याच भरवश्यावर वर्षभरातील आर्थिक व्यवहाराचे नियोजन केले होते. परंतु कांद्यानेच आमचे वांदे केले त्यामुळे कांदा विकुन आणखी तोट्यात जाण्यापेक्षा तो मानवाच्या मुखात गेलेला बरा म्हणून तो लोकांना मोफत उपटून घ्या असे आव्हान केले. अचानक भाव उतरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक शेतकऱ्यांचा विचार करावा अशी माागणी शेतकरी करत आहेत.

हेही वाचा: Onion Farmers In Trouble : रास्त भाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मागितली आत्महत्येची परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.