मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या अनैसर्गिक निधनानंतर बॉलिवूडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्या मृत्यूला काही दिग्गज हस्ती जबाबदार असल्याचा आरोप सोशल मीडियावरुन सुरू झाला आहे. याबद्दल उघडपणे आक्रोशही करण्यात येत आहे.
बुधवारी ट्विटरवर #जस्टिसफॉरसुशांत ट्रेंड करीत होता. यासोबतच युजर्सनी निर्माता करण जोहर आणि त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणीही केली. करणवर बॉलिवूडमध्ये घराणेशाही चालवत असल्याचा आरोप केला जात आहे.
ट्विटरवर एका युजरने म्हटलंय, ''आपल्याला करण जोहरच्या चित्रपटांवर बहिष्कार घातला पाहिजे.''
दुसरा एक युजर म्हणतो, ''सर्वात वाईट गोष्ट ही आहे की भाई-भतिजावादातून खुनी, देशद्रोही, गावंढळ, अशिक्षित लोकांना तू सुपरस्टार बनवतोस...परंतु एखाद्या एआईआर-7/स्कॉलर/फिजिक्स ऑलंपियाड विनरला नाही.''
आणखी एक युजरने करण जोहर आणि यश राज फिल्म्सला टॅग करत लिहिलंय, ''तुम्ही लोकांनी खऱ्या प्रतिभेला मारुन टाकले. स्वतःच्या हिंमतीवर स्थान निर्माण करणाऱ्या, बाहेरुन आलेल्या लोकांचा तिरस्कार तुम्ही का करता?''
यासोबतच सुशांतसिंहचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' ओटीटीवर नाही तर थिएटरमध्ये रिलीज करण्याची मागणीही करण्यात आली आहे.