कोविड-१९ चा परिणाम मधुमेह असलेल्या लाखो लोकांसह देशातील प्रत्येकावर झाला आहे. भारतात मधुमेह असलेल्यांची संख्या ७ कोटी आहे. भारतात ५ सदस्यांचे एक कुटुंब असे गृहित धरले तर, त्याचा अर्थ असा आहे की ३ कोटी ५० लाख लोकांना मधुमेहाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्रास आहे. मधुमेहावर परिणाम करणाऱ्या इतर घटकांव्यतिरिक्त, तणाव आणि चिंता हे मधुमेह असलेले लोक आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचा विचका करू शकतात.
कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका देशातील कुणालाही आहे अगदी तसाच मधुमेह असलेल्या लोकांनाही आहे. मात्र, मधुमेह असलेल्या लोकांना कोविड-१९ आजार झाला तर, अत्यंत गंभीर स्वरूपाची गुंतागुंत होण्याची शक्यता इतरांपेक्षा कितीतरी उच्च प्रमाणात असते. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये कोरोना विषाणु अधिक तीव्र स्वरूपाची लक्षणे आणि गुंतागुंत निर्माण करतो. जेथे प्रथम महामारीचा प्रसार झाला, त्या देशांमध्ये असे पाहिले गेले आहे. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये गंभीर परिणामांचा धोका खूप उच्च प्रमाणात असतो आणि ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी तर धोका सर्वोच्च पातळीवर आहे.
जेव्हा मधुमेह असलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणुचा संसर्ग होतो, तेव्हा रक्तातील साखरेच्या नियंत्रणावर दुष्परिणाम होतो. त्या व्यक्तीचे शरीर विषाणुच्या संसर्गावर मात करण्यासाठी अधिक वेळ काम करू लागते, ज्याचा परिणाम रक्तातील साखरेच्या प्रमाणात सतत तीव्र चढउतार होत राहतात. आपल्याला हे माहित आहे की मधुमेहाचा परिणाम शरिरातील सर्व अवयवांवर होत असतो आणि कमी प्रमाणात नियंत्रण असल्याने डोळे, पाय, किडन आणि शरीराच्या अन्य अवयवांशी संबंधित समस्या आणखी तीव्र होतात. म्हणून, मधुमेह असलेल्या लोकांनी अत्यंत काळजी घेतली पाहिजे आणि कोविड-१९ चा आजार होऊ नये म्हणून जे सल्ले दिले जातात त्यांचे इतरांपेक्षा अधिक कडकपणे पालन केले पाहिजे.
लॉकडाऊनमुळे, मधुमेह असलेले लोक, एरवी सामान्य परिस्थितीत ते जो दररोज चालण्याचा आणि इतर व्यायाम करण्यात गुंतलेले असतात, तो करण्यास असमर्थ असतात. तसेच या दिवसात स्थानिक किराणा दुकानदाराकडून मिळालेल्या वस्तूंवरच गुजराण करावी लागत असल्याने आपल्या आहारावर लक्ष ठेवणे अवघड बनते. सर्व मधुमेह असलेले लोक आपल्या रोगाची नेहमी घेत असलेल्या काळजीच्या पैलूंव्यतिरिक्त दररोजच्या औषधांवर अवलंबून असतात. त्यांच्याजवळील औषधांचा साठा संपत आला असेल आणि ते नेहमी वापरत असेलली विशिष्ट ब्रँडची औषधे स्थानिक औषध दुकानदाराकडे उपलब्ध नसतील तर त्यांना काळजी वाटू लागण्याची शक्यता आहे.
मधुमेह असलेल्या लोकांनी काय केले पाहिजे?
- घरात राहण्याचे धोरण कडकपणे अंमलात आणा. १ ते २ मीटर शारिरिक अंतर राखण्याच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा. तुम्हाला भेटायला येणारे लोक सुरक्षित अंतरावर रहातील, याची खबरदारी घ्या. जर औषधे किंवा किराणा खरेदी करायचा असेल तर कुटुंबातील दुसऱ्या एखाद्या सदस्याला किंवा शेजार्याला किंवा सुरक्षा रक्षकाला पाठवून आणवणे अधिक चांगले ठरेल.
- केवळ मधुमेह असलेली व्यक्तीच नव्हे तर घरातील प्रत्येक जण हात स्वच्छ धुण्याचे आणि साबण आणि पाण्याने हात वारंवार धुण्याच्या शिष्टाचाराचे पालन करेल, याची सुनिश्चिती करा.
- जी औषधे अगोदर घेतली जात होती ती सर्व पुढेही सुरू ठेवली पाहिजेत. बदललेल्या परिस्थितीमुळे स्वतःच्या मनानेच औषधे बंद करू नका किंवा त्यांचे प्रमाण कमी करू नका. जर तुम्ही रक्तदाब कमी करण्याची इतर औषधे, अॅस्पिरिन आदी घेत असाल तर, त्याच प्रमाणात पूर्वीसारखीच ती औषधे घेणे सुरू ठेवा.
- ३ ते ४ आठवडे पुरेल इतका मधुमेहावरील औषधांचा साठा असू द्या ज्यामुळे तुमच्याजवळची मधुमेह नियंत्रणासाठी असलेली जीवनावश्यक औषधे संपणार नाहीत.
- तुमच्या औषधांच्या साठ्यावर लक्ष ठेवा आणि एक आठवडा पुरेल इतका साठा कमी झाला की नव्याने ताजी औषधे आणण्याची व्यवस्था करा. लॉकडाऊनच्या कालावधीत इन्सुलिन किंवा मेटफॉर्मिन ही विशिष्ट ब्रँडची औषधे उपलब्ध नसण्याची शक्यता आहे. तुमच्या नेहमीच्या औषध दुकानदाराशी बोला आणि पर्यायी औषधे कोणती उपलब्ध आहेत ते विचारा. तुमच्या डॉक्टरांनाही दूरध्वनी करून पर्यायी औषधे वापरता येतील, याची चौकशी करा. नेहमीपेक्षा वेगळ्या ब्रँडची औषधे खरेदी करावी लागली तरीही तुमच्या मधुमेहावर नियंत्रण करणारी औषधे नियमितपणे घेणे महत्वाचे आहे,हे लक्षात ठेवा.
- तुमचा आहार पूर्वी होता तसाच राहिला पाहिजे. दिवसात ३ वेळा जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या अंतराने सतत कमी प्रमाणात आहार घेणे चांगले आहे. बदलत्या हवामानाबरोबर शरीर उष्ण आणि कोरडे होत असल्याने तुम्ही भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे घरीच तपासून पहात असाल तर, तसे करणे सुरू ठेवा. तुम्ही तुमचा नियमित शारिरिक व्यायाम करत नसल्याने अधिक वारंवार तुम्हाला रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पहायला लागेल.
- नेहमीपेक्षा जास्त लघवी होणे (विशेषतः रात्रीच्या वेळेला), अती तहान लागणे, डोकेदुखी, थकवा आणि आळस यासह साखरेचे प्रमाण वाढण्याच्या लक्षणांबद्दल जागरूक रहा.
- तुम्ही मधुमेहाच्या नियमित तपासणीसाठी किंवा कोणत्याही प्रलंबित तपासणीसाठी रूग्णालयात किंवा दवाखान्यात जाऊ नका. जोपर्यंत तुम्हाला बाहेर जाणे सुरक्षित आहे, असे सांगितले जात नाही तोपर्यंत ही तपासणी टाळली जाऊ शकते.
- घरातच अडकून पडला असाल तरीही त्याचा अर्थ तुम्ही नेहमीचा व्यायाम थांबवावा, असा नाही. तुम्ही सायंकाळी चालण्यासाठी बाहेर पडू शकत नसाल, परंतु घरात चालण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. ४०० ते ५०० पावले ४ वेळा चालणे हे दीड ते दोन किलोमीटर चालण्याइतके आहे. शरिर ताठ करून वाकण्याचा व्यायाम करता येऊ शकतो. एकाच जागी खूप वेळ बसू नका. ४५ ते ६० मिनिटे एका जागी बसल्यावर उठून थोडेसे चाला. बसले असतानाही तुमचे पाय आणि हात सतत गोल फिरवत रहा ज्यामुळे ताठरपणा कमी होईल.
- मुले, नातू किंवा तुमच्या साथीदाराबरोबर घरातील सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घ्या. पत्ते खेळणे किंवा कॅरम, लुडो, सापशिडी असे बैठे खेळांचा यात समावेश करता येईल. ज्यात परिवार गुंतलेला राहिल, अशा किस्से कहाण्या किंवा कौटुंबिक गॉसिप हे मनोरंजनात्मक होऊ शकते.
- जर घरातील कुणाला कोविड-१९ चा संशयित असल्याचे किंवा त्याला तो आजार झाल्याचे सिद्ध झाले असेल तर, तो तुमच्यापासून आणि इतर सर्वांपासून अलग राहतील, याची खबरदारी घ्या.
लक्षात ठेवा की, मधुमेह असलेल्या व्यक्तिंना संसर्ग होण्याचा सारखाच धोका असतो परंतु तो रोखण्यासाठी दिलेल्या सल्ल्याचे पालन करून स्मार्ट रहाणे तुम्हाला कोविडमुक्त करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
- डॉ. जीव्हीएस मूर्ती, (संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, हैदराबाद)