ETV Bharat / city

अनंत करमुसे मारहाण प्रकरण : सूत्रधारावर कारवाई व पोलिसांचे निलंबन करा, भाजपचे पोलीस आयुक्तांना निवेदन

author img

By

Published : Oct 9, 2020, 7:04 PM IST

भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कारवाईची मागणी केली.

bjp
भाजपचे पोलीस आयुक्तांना निवेदन

ठाणे - ठाण्यातील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाणप्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करावी. तसेच या प्रकरणात अटक केलेल्या तीन पोलीस शिपायांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे भाजपने केली आहे. भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कारवाईची मागणी केली.

ठाण्यातील एका मंत्र्यांच्या निवासस्थानी अनंत करमुसे यांना ५ एप्रिल रोजी मारहाण करण्यात आली होती. मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनीच करमुसे यांना घरातून नेले होते. या प्रकरणात सुमारे ६ महिन्यांनंतर पोलीस शिपायांना अटक करण्यात आली. मात्र, अद्यापि या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच त्याची चौकशीही करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपने आज पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.

मारहाण प्रकरणात अटक केलेल्या तीन पोलीस शिपायांच्या चौकशीत कोणत्या बाबी उघड झाल्या, करमुसे यांना घरातून आणण्यासंदर्भात संबंधित पोलिसांना कोणी आदेश दिला होता? करमुसे यांनी नोंदवलेल्या तक्रारीत एका मंत्र्यासमोर मारहाण झाली असल्याचा उल्लेख आहे. या संदर्भात गेल्या सहा महिन्यांच्या काळात पोलिसांनी कोणता तपास केला? त्याचबरोबर अटक केलेल्या तीन पोलीस शिपायांविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपने निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, इंजिनिअर अनंत करमुसे यांच्यावरील मारहाणप्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी. राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आव्हाडांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.