ETV Bharat / city

Nashik ETV Bharat Special Story : धरणांच्या जिल्ह्यात स्त्रियांची हंडाभर पाण्यासाठी रात्रभर वणवण भटकंती

author img

By

Published : Apr 9, 2022, 12:53 PM IST

Updated : Apr 9, 2022, 2:15 PM IST

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सुरगाण्यातील आदिवासी पाड्यावर पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी येथील नागरिकांना दिवस रात्र भटकंती करावी लागत आहे. दुरदुर डोंगरातील झिऱ्यांमधून हंडापाण्यासाठी दिवस दिवस वाट पाहावी लागत आहे. पाण्याची भीषणता दर्शवणारा हा ईटीव्ही भारताचा विशेष रिपोर्ट.

Nashik ETV Bharat Special Story
हंडाभर पाण्यासाठी रात्रभर वणवण भटकंती

नाशिक - 'आदिवासी भागातील पाझर स्रोत आटले, तरीही इकडे सरकारलाही पाझर फुटेना' पाणी टंचाईच्या भीषण संकटात सापडलेला आदिवासी समाज कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी दाही दिशा पायपीट करीत ( women have to walk all night to fetch a pot of water ) आहे. पाण्यात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेणारा उर्वरित महाराष्ट्र जेव्हा ढेकर देऊन गादीवर पहुडण्याची तयारी करीत असतो. तेव्हा ही आदिवासी माय भगिनी काळ्या कुट्ट अंधारात काटेकुटे, झुडपे, तुडवत दगड धोंड्यांना ठेचाळत डोक्यावर रिकामी घागर घेऊन पाण्याच्या शोधात भटकत असते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सुरगाण्यातील आदिवासी पाड्यावरचे हे भीषण वास्तव आहे. धरणांचा जिल्हा म्हणून शेखी मिरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यात जिथून पाणी पाझरते, ओढ्या नाल्यामधून प्रवाहित होऊन धरणात साठते. त्या आदिवासी भागालाच पाण्याची तीव्र टंचाई भासते हे वास्तव नेहमीचेच. या पाणी टंचाईने कोरडा पडलेल्या घशातून धरण उशाशी कोरड घशाशी या शब्दांचे उच्चारण करण्याचे त्राणही या माता भगिनींमध्ये उरले नाहीत.

हंडाभर पाण्यासाठी रात्रभर वणवण भटकंती

हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती - सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्यावर असलेली भीषण पाणी टंचाई पाहून हृदय पिलवटून जाते. डोक्यावर, कमरेवर हंडी, कळशी हातात बॅटरी घेऊन, पाण्याच्या शोधात निघालेली आदिवासी पाड्यावरची वृद्ध महिला. हे चित्र पाहून जिल्हा व्यवस्थेला कुठलीच दया येत नाही. हे पाहून मन अस्वस्थ होते. सुरगाणा तालुक्यातील मोरडा अवघ्या 600 लोकवस्तीचा पाडा मात्र पिण्यासाठी पाणीच नसल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी दिवस रात्र भटकावे लागते. दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि नंतर पाण्याचा शोध घ्यायचा एवढाच दिनक्रम. गावातील विहिरीने तळ गाठलाय. तासनतास वेळ घालवल्यानंतर एखादा दुसरा हंडा भरतो, म्हणूनच डोंगर दऱ्याची काट्याकुट्याची वाट तुडवीत या महिलांचा अनवाणी प्रवास सुरु होतो. त्यातच हिंस्र पशूंची भीती दूर करण्यासाठी गावातील तरुण कोणी टेंभे घेऊन तर कोणी मोबाईल फ्लॅशचा उपयोग करून महिलांची पाठराखण करतांना दिसतात. या भटकंतीत एखादा झरा सापडला तर विश्व प्रदक्षिणा पूर्ण केल्याचे समाधान या माय माऊलीच्या चेहऱ्यावर झळकताना दिसते. मग महिलांची रांग लागते.

नवविवाहितेला चुडा उतरण्याच्या आधी घ्यावा लागतो डोक्यावर हंडा - वर्षोनुवर्षे हीच दुरावस्था ललाटी लेवून ही पायपीट सुरु आहे. केवळ माणूसच नाही तर मुकी जनावरेही या पाणी टंचाईला बळी पडत आहेत. लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीत येताय आश्वासन देऊन निघून जातात. पाणी टंचाई तशीच पुढील पाच वर्षाची प्रतीक्षा तशीच रहाते. लग्न करून गावात सून म्हणून आलेल्या नवं विवाहितेला चुडा उतरण्याच्या आधी डोक्यावर हंडा घेऊन अनवाणी दाही दिशा भटकंती करीत पाण्याचा झरा शोधण्याची वेळ येते. हा केवळ मोरडा या एकाच गावाचा प्रश्न नाही तर आजूबाजूच्या गळवड, शिरीषपाडा, दांडीची बारी, म्हैसमाळ, देवळा, धुरापाडा, खुंटविहीर, मोहपाडा आशा अनेक गावची समस्या आहे. गावातील लेकींना लहानपणापासूनच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, सुनांना लग्न झाल्यापासून पाण्याच्या खेपा मारायला जुंपावे लागते, म्हणूनच पेयजल योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा - Sanjay Raut on Silver Oak Attack : 'राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र'

Last Updated : Apr 9, 2022, 2:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.