ETV Bharat / city

डॉ. आंबडेकरांच्या नेतृत्वात 5 वर्षे 11 महिन्यांचा 'काळाराम मंदिर सत्याग्रह'.. मात्र 'या' कारणाने बाबासाहेबांनी कधीही ठेवले नाही मंदिरात पाऊल

author img

By

Published : Jan 26, 2022, 6:59 AM IST

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अनेक आंदोलनांमध्ये नाशिकच्या श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला विशेष असे महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेबांनी अनेक दिवस विचार केल्यानंतर या सत्याग्रहाचे नेतृत्व करण्याचे मान्य केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः सत्याग्रहाचे नेतृत्व करणार हे कळाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते. हा सत्याग्रह 5 वर्षे 11 महिने आणि 5 दिवस सुरू होता. अखेर मानवी हक्क मिळवण्यासाठी अस्पृश्य समाजाला 2 मार्च 1930 रोजी स्वाभिमानाने श्री काळाराम मंदिर प्रवेश मिळाला.

Kalaram temple Satyagraha
Kalaram temple Satyagraha

नाशिक - महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अनेक आंदोलनांमध्ये नाशिकच्या श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला विशेष असे महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेबांनी अनेक दिवस विचार केल्यानंतर या सत्याग्रहाचे नेतृत्व करण्याचे मान्य केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः सत्याग्रहाचे नेतृत्व करणार हे कळाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते. हा सत्याग्रह 5 वर्षे 11 महिने आणि 5 दिवस सुरू होता. अखेर मानवी हक्क मिळवण्यासाठी अस्पृश्य समाजाला 2 मार्च 1930 रोजी स्वाभिमानाने श्री काळाराम मंदिर प्रवेश मिळाला आणि यामुळे सत्याग्रह आणि इतिहासाचे सोनेरी पान उघडले गेले. मात्र सत्याग्रहाचे नेतृत्व करून सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही श्री काळाराम मंदिराचे प्रवेशद्वार ओलांडले नाही..

..असा झाला मंदिर प्रवेश -
श्री काळाराम मंदिर सत्याग्रहात नाशिक जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून नागरिक सहभागी झाले होते. 2 मार्च 1930 च्या सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत डी.व्ही. प्रधान, बाळासाहेब खरे, सहस्रबुद्धे, स्वामी आनंद, शंकरराव गायकवाड, भाऊराव गायकवाड, कर्मवीर दादासाहेब गायकवाड आदि नेतेमंडळी होते. यावेळी धोतर, अंगरखा, पुणेरी जोडा, पंचा, कपाळावर लाल टिळा लावून शंकरराव गायकवाड यांनी गोदावरी नदीत उडी घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय.. अशा घोषणा दिल्या. त्यावेळी त्यांना पोलिसांनी जबर मारहाण केली होती. आंबेडकर चळवळीतील तरुणाने रामकुंडात आंदोलन केलं हे कळाल्यावर ब्रिटिश जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी झाले होते. यावेळी मंदिर परिसरात सनातन्यानीं शेकडो आंबेडकर अनुयायीवर दगडफेक केली. तरी सुद्धा आंदोलकर्ते सत्याग्रहींसमोर सरकारला झुकावे लागले..

काळाराम मंदिर सत्याग्रहाविषयी माहिती देताना अभ्यासक
आम्ही पण सजीव माणसं आहोत..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आम्हाला काळाराम मंदिरात प्रवेश करून रामभक्त बनायचे नाही, तर या भारत देशात असणाऱ्या दगड जाती व्यवस्थेला सांगायचे आहे की, आम्ही पण एक सजीव माणूस आहोत. हे दाखवून द्यायचे आहे, जो धर्म आम्हाला स्विकारत नाही, त्या ठिकाणी लाचार होऊन काय उपयोग, असं म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्विकार केला.
पेशवेकालीन मंदिराचे महत्व -
श्रीराम सव्वा दोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. ओढा नाशिकरोड येथील जहागिरी असलेले पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचे बांधकाम करण्याची आज्ञा केली आणि याच काळात ओढेकर यांना प्रभु श्रीरामाचा ‘तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असा स्वप्नदृष्टांत झाल्याचे बोलले जाते. श्री काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होते. समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात श्रीरामाची उपासना केली होती. मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या ‘रामकुंडा’त मिळालेल्या आहेत. या मूर्ती वालुकामय आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘रामशेज’ नावाच्या डोंगरावरून दगड आणण्यात आले. या डोंगरावर श्रीराम रात्री निद्रा करण्यासाठी जात असत. या डोंगरावरील दगड काढल्यानंतर दूध आणि नवसागर टाकून उकळून त्याची परीक्षा केली गेली. पूर्ण बांधकाम या दगडांपासून झाले आहे. 1778 ते 1790 या कालखंडात मंदिर पूर्ण झाले. त्यावेळेस या मंदिराच्या बांधकामाला 23 लाख रुपये खर्च आला होता. दरवर्षी देशभरातून हजारो पर्यटक दर्शनासाठी या मंदिरात येत असतात.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.