नाशिक - ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदादेखील मंदीर भाविकांसाठी बंद आहे. सलग दुसऱ्याही वर्षी कोरोनामुळे रामनवमी उत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. मात्र मंदिरावर विद्युत रोषणाई न केल्याने भाविकांद्वारे नाराजी व्यक्त केली जात आहे. काळाराम मंदिरात गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.
वणीच्या मंदिरात गुढीपाडवा साध्या पद्धतीने साजरा
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणी येथील मंदिरात गुढीपाडवा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा विधी संपन्न झाली आहे. वणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वी सप्तशृंगी गड प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला होता. त्यामुळे याठिकाणी गुढीपाडवा उत्सवाच्या वेळेस नागरिक उपस्थित नव्हते. परंतु पुजाऱ्यांनी विधिवत पूजाअर्चा करून चैत्र पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या यात्रा उत्सवाला सुरुवात केली आहे.
नव्या हंगामाच्या मशागतीचा प्रारंभ
चैत्राच्या पहिल्या दिवशी कृषीजीवनाचे नवे वर्ष आजपासून सुरु झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळी उठून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात केली. सकाळीच आपल्या शेतात जाऊन नांगर जुंपून नवीन वर्षाचे स्वागत केले, नंतर आपल्या बैलांना अंघोळ घालून त्यांना नैवेद्य देले. खानदेशात ही परंपरा कायम आहे. बदलत्या काळात मात्र ही परंपरा काही ग्रामीण भागातील ठरावीक शेतकरीच जोपासत असतांना दिसून येत आहे.
हेही वाचा - गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला फुलांची आरास