ETV Bharat / city

Political Parties : 2014 ला भाजपसोबत गेलेल्या लहान पक्षांची अस्तित्वाची लढाई

author img

By

Published : Jun 18, 2022, 7:40 PM IST

2014 साली भारतीय जनता पक्षाने ( BJP ) केलेल्या महायुतीत रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) ( Republican Party ), राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana ), शिवसंग्राम संघटना, ओबीसी नेत्यासह अजूनही काही स्थानिक लहान पक्ष आणि संघटना जोडल्या गेल्या होत्या. मात्र, आज हे पक्ष आपले राजकीय अस्तित्व शोधत आहेत, अशी परिस्थिती झालेली पाहायला मिळतेय.

ASJK
ASJK

मुंबई - 2014 साली भारतीय जनता पक्षाने ( BJP ) केलेल्या महायुतीत रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) ( Republican Party ), राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana ), शिवसंग्राम संघटना, ओबीसी नेत्यासह अजूनही काही स्थानिक लहान पक्ष आणि संघटना जोडल्या गेल्या होत्या. मात्र, आज हे पक्ष आपले राजकीय अस्तित्व शोधत आहेत, अशी परिस्थिती झालेली पाहायला मिळतेय.

लहान पक्षांची स्थिती काय - राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषदेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आणि महा विकास आघाडीने लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांवर आपले लक्ष केंद्रित केलं. भारतीय जनता पक्ष सातत्याने या निवडणुकांमध्ये लहान पक्ष आणि अपक्ष आमदार हे आपल्या बाजूने असल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. महा विकास आघाडीच्या भोंगळ कारभाराला अपक्ष आमदार आणि लहान पक्ष कंटाळले आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतांशी अपक्ष आमदार आणि लहान पक्ष आपल्यासोबत असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय. मात्र, 2014 साली विधानसभा निवडणुकीआधी देखील भारतीय जनता पक्षाने राज्यातील अनेक लहान पक्षांना सोबत घेऊन महायुती तयार केली होती. त्या लहान पक्षाची आज नेमकी काय स्थिती आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

छोट्या पक्षांना राजकीय वजन नाही - 2014 साली भारतीय जनता पक्षाने केलेल्या महायुतीत रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम संघटना, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड, ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांच्यासह अजूनही काही स्थानिक लहान पक्ष आणि संघटना जोडल्या गेल्या होत्या. 2014 सालच्या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती शिवसेना देखील सामील झाली होती. मात्र, आज या लहान पक्षांपैकी रिपब्लिकन पक्ष वगळता इतर पक्ष आपलं राजकीय अस्तित्व शोधताना दिसत आहेत. तर शिवसेनेने थेट भारतीय जनता पक्षाला 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली आहे. मात्र सत्तेत असतानाही शिवसेनेकडून सातत्याने भारतीय जनता पक्ष मित्रपक्षाला संपवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप सातत्याने केला गेला आहे. त्यातच इतर राजकीय पक्षांची सध्याची परिस्थिती पाहिली तर त्या पक्षांना राजकीय वजन सध्या राहिलेला दिसत नाही.

राष्ट्रीय समाज पक्षाचे पिछेहाट - महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष 2014 साली महायुतीत सामील झाला. यावेळी रासप पक्षाचे तीन आमदार होते. महादेव जानकर यांना भारतीय जनता पक्षाने कॅबिनेट मंत्री पदही दिले. मात्र 2019ची विधानसभा निवडणूक येता-येता रासप पक्षातील दोन आमदार भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतले. याबाबत महादेव जानकर यांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कमालीची नाराजी होती. आता सध्या रासप पक्षाचा केवळ एक आमदार रत्नाकर गुट्टे निवडून आलेले आहेत. पक्षाचे सर्वोसर्वा सध्या भारतीय जनता पक्षावर पूर्णपणे नाराज असून पुन्हा एकदा आपल्या पक्षांची मोर्चेबांधणी करण्यासाठी राज्यभर दौरे करत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला पक्ष पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवेल. कोणत्याही पक्षाची मदत निवडणुकीमध्ये घेतली जाणार नाही किंवा कोणत्याही पक्षाला मदत केली जाणार नाही असं महादेव जानकर यांनी असे ईटीव्ही शी बोलताना सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष फुटला - या युतीत सामील झालेला स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष महायुतीत आल्यानंतर फुटला. या पक्षाचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. तथापि, राजू शेट्टी यांचे भारतीय जनता पक्षासोबत मतभेद सुरू झाले होते. या मतभेदानंतर राजू शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दुसरे नेते सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यापासून वेगळं होत आपली वेगळी संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. भारतीय जनता पक्षानेही त्यांना राज्यमंत्रीपद बहाल केलं होतं. या सर्व प्रकारात महायुतीत असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीत गेल्यानंतर तडा गेला.

सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज मागे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून सदाभाऊ खोत यांनी 'रयत क्रांती संघटना' तयार केली. आपल्या संघटनेचा पाठिंबा त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिला होता. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना राज्य मंत्रीपदही देण्यात आलं. मात्र 2019 च्या निवडणुकीनंतर भाजपची सत्ता गेली. विधान परिषदेवर असलेले सदाभाऊ खोत यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली नाही. 20 जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सदाभाऊ खोत यांनी केला होता. भारतीय जनता पक्षाने अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज करण्यास पूर्ण पाठिंबा सदाभाऊ खोत यांना दिला होता. मात्र शेवटच्या क्षणी सदाभाऊ खोत यांना आपला अर्ज मागे घेण्याचे आदेश भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आले. त्यामुळे सध्या सदाभाऊ खोत यांच्या हातातही कोणतेही पद शिल्लक नाही. केवळ आपल्या संघटनेसाठी त्यांना काम करावे लागणार आहे. अर्ज मागे घेण्याचा आदेश भारतीय जनता पक्षाकडून दिल्यानंतर सदाभाऊ खोत देखील भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मित्र पक्षालाच भाजपचा संपवण्याचा प्रयत्न - भारतीय जनता पक्षाने नेहमीच आपल्या मित्र पक्षांना संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शिवसेनेकडून सातत्याने केला जातो. 2014 च्या नंतर सत्तेत असतानाही वेळोवेळी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून झाला असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी भाजपवर केला आहे. 2014 साली महायुतीत असणारे इतर पक्षांचा सध्या स्थितीत काय परिस्थिती आहे याकडे लक्ष टाकल्यास आपल्यासोबत असलेल्या मित्र पक्षासोबत भारतीय जनता पक्ष काय करेल हे लक्षात येतं असा चिमटा शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी भारतीय जनता पक्षाला काढला आहे. ओबीसी नेते असतील किंवा महादेव जानकर असतील यांना योजना आखून भाजपने संपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला जातो. शिवसेनेलाही संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला होता. मात्र, त्यांचा डाव शिवसेनेने वेळेत ओळखल्यामुळे शिवसेनेसोबत भारतीय जनता पक्षाला ते करता आलं नाही, असा थेट आरोप मनिषा कायंदे यांनी व्यक्त केला आहे.

आठवले यांना भाजपच्या साथीचा लाभ - महायुतीत असणाऱ्या इतर पक्षांना भाजप सोबत जाण्याचा फटका बसला असला तरी, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांना भाजपच्या साथीचा चांगलाच लाभ झाला आहे. 2014 साली सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री खाते देण्यात आले होतं. अद्यापही रामदास आठवले केंद्रात मंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिपदाचा त्यांना आणि त्यांच्या पक्षाला लाभ झाला आहे.

ओबीसी नेते भाजपवर नाराज - राज्यामध्ये 2014 साली महायुती तयार होत असताना ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे आणि हरिभाऊ राठोड यांनीही महायुतीत जाणं पसंत केले. मात्र भारतीय जनता पक्षासोबत पुढे झालेल्या मतभेदांमुळे या दोन्ही ओबीसी नेत्यांनी महायुतीतून काढता पाय घेतला.

हेही वाचा - MNS Chief Raj Thackeray : राज ठाकरे आज लिलावती रुग्णालयात होणार दाखल, लवकरच होणार शस्त्रक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.