ETV Bharat / city

ऊसतोड मजुरांचा स्वगृही परतीचा मार्ग मोकळा; शासन निर्णय जारी

author img

By

Published : Apr 17, 2020, 7:24 PM IST

ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटूंबीयांसीठी त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बद्दलचा आदेश शासनाने काढला आहे.

sugarcane-break-laborers-are-allowed-to-visit-their-hometowns
ऊसतोड मजुरांचा स्वगृही परतीचा मार्ग मोकळा; शासन निर्णय जारी

मुंबई - ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटूंबीयांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ऊसतोड मजुरांना आवश्यक तपासण्या करून त्यांच्या स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा महसूल विभागाच्या मार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे बीड, अहमदनगर यांसह विविध जिल्ह्यातील ऊसतोड मजूर जो पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भाग यासह राज्यातील विविध भागात अडकलेले आहेत, त्यांन आता स्वगृही परत जाता येणार आहे. यासाठी धनंजय मुंडे सतत प्रयत्नशील होते. मागील मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी याबाबत व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे मागणी केली होती. सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी व पाठपुरावा त्यांनी केला होता.

राज्यातील ३८ साखर कारखान्याकडे सुमारे १, ३१, ००० ऊसतोड कामगार तात्पुरत्या निवारा गृहात आहेत. अन्य काही ऊसतोड मजूर कारखाने बंद झाल्यामुळे गावी परतत असताना संचारबंदी मुळे रस्त्यात अडकून पडले आहेत. अनेक जण आपल्या कुटुंबियांपासून दूर असून त्यांच्या व त्यांच्याकडे असणाऱ्या जनावाऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला होता.

Sugarcane break  laborers are allowed to visit their hometowns
ऊसतोड मजुरांचा स्वगृही परतीचा मार्ग मोकळा; शासन निर्णय जारी

कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्यासाठी कारखाना प्रशासनाकडून १४ दिवसांपेक्षा जास्त काळ निवारा गृहात राहिलेल्या मजुरांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्यानंतर त्यांची माहिती त्यांच्या संबंधित जिल्हा प्रशासनाला व संबंधीत ग्रामपंचायतीला देण्यात येईल. यानंतर त्यांना आपल्या गावी परत जाता येईल. यासाठी लागणारी परवानगी संबंधित कारखाना प्रशासन काढून देईल. त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी, त्या त्या गटाचे मुकादम व मजुरांच्या संबंधित गावचे सरपंच यांच्याशी समन्वय साधून मजूर, त्यांचे कुटुंबीय यांना त्यांच्या जनावरांसहित सुखरूप त्यांच्या गावी पोहोच करावे, असे या आदेशात म्हटले आहे.

परतीच्या प्रवासासाठी मुकादमाच्या मदतीने गावनिहाय गट तयार करावेत, त्यांच्या गाव परतीचा इव्हाक्युएशन प्लॅन तयार करून तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना माहितीस्तव पाठवावा, जेणेकरून ऊसतोड मजूर जिथे जाणार आहेत, त्या त्या गावांमध्ये पुढील व्यवस्था करणे सोपी जाईल.

संबंधित जिल्हाधिकारी/ तहसीलदार यांच्या मान्यतेने मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोच करणे, त्यांच्या भोजन, पाण्याची व्यवस्था करणे यासह सर्व जबाबदारी संबंधित साखर कारखान्यांची असेल असेही या निर्णयाद्वारे आदेशीत करण्यात आले आहे. प्रत्येक गटप्रमुख/ मुकादमाने परतीच्या प्रवासादरम्यान कारखाना प्रशासनाने मिळवून दिलेले परतीचे परवाना पत्र सोबत बाळगावे असेही या आदेशात म्हटले आहे. गावोगाव परतणाऱ्या कामगारांची एकूण संख्या, नावे आणि आरोग्य तपासणी बाबतची माहिती संबंधित ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासनाला कळवावी असा खरबदरीचा उपायही या निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आला आहे.

माझ्या ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर - धनंजय मुंडे

लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून ऊसतोड मजुरांच्या घरवापसी पासून ते ज्या ठिकाणी आहेत, त्याच ठिकाणी त्यांची सर्व व्यवस्था व्हावी यासाठी धनंजय मुंडे परिश्रम घेत होते. त्यांनी या आदेशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

ऊसतोड कामगारांचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्‍या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा, असे आवाहनही मुंडे यांनी ऊसतोड कामगारांना केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.