ETV Bharat / city

गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज; 2200 जादा बसेस सोडणार कोकणात

author img

By

Published : Jul 14, 2021, 8:24 PM IST

यंदा एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे, पालघर विभागामधून २ हजार २०० एसटी बसेस कोकणात सोडण्यात येणार आहे. ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून, चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे.

st bus
एसटी

मुंबई - गणेशोत्सवासासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची तुफान गर्दी लक्षात घेता, यंदा एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे, पालघर विभागामधून २ हजार २०० एसटी बसेस कोकणात सोडण्यात येणार आहे. ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून, चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. तर १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. १६ जुलै २०२१ पासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरु होईल, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

  • गाड्या सोडण्याचे नियोजन पूर्ण -

दरवर्षी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीन अतिरिक्त बस गाड्या सोडण्यात येतात. मात्र, गेल्या वर्षी कोरोनामुळे राज्यात जिल्हा प्रवासावर बंदी होती. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. गेल्या वर्षी २२ ऑगस्टला गणेशाचे आगमन झाले होते. परंतु, राज्य सरकारच्या वेळखाऊ धोरणामुळे गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर आल्यानंतर एसटी चालवण्यात आल्या. त्यातही १२ ऑगस्टनंतर ४८ तासापूर्वी कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांनाचा कोकणात जाण्याची परवानगी होती. तसेच दहा दिवसांचे विलगीकरण बंधनकारक होते. त्यामुळे चाकरमान्यांनी कोकणात जाण्यासाठी एसटीला नेहमीप्रमाणे प्रतिसाद दिला नाही. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता यंदा मात्र महामंडळाने कोकणासाठी गाड्या सोडण्याचे नियोजन दोन महिने आधीच केले आहे.

हेही वाचा - विधानसभा अध्यक्ष नियुक्तीसह मंत्री बदलाचेही वारे?

  • ४ सप्टेंबरपासून धावणार बसेस -

यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा यंदा कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी एसटीकडून २ हजार २०० गाड्या सोडण्यात येणार आहेत. यंदा १० सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन होणार आहे. त्यामुळे या बस गाडया ४ सप्टेंबर २०२१ पासून धावणार आहेत. तसेच या विशेष बस गाड्यांचे आरक्षण येत्या दोन ते तीन दिवसात सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता यंदा मात्र महामंडळाने कोकणासाठी गाड्या सोडण्याचे नियोजन दोन महिने आधीच केले आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर विभागातुन २२०० गाड्या कोकणात सोडण्यात येणार आहेत.

  • महामंडळाकडून पूर्ण तयारी-

प्रवासापूर्वी सर्व बसेस सॅनिटाइझ केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

  • ७२ गणपती स्पेशल ट्रेनचे आरक्षण फुल्ल-

गणेशोत्सवासाकरिता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गेल्या महिन्यात मध्य रेल्वेने 72 गणपती स्पेशन ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या गाड्यांचे आरक्षणसुद्धा सुरु केले होते. मात्र, अवघ्या काही दिवसात मध्य रेल्वेच्या ७२ विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. या गणपती स्पेशन ट्रेन सीएसएमटी ते सावंतवाडी, सीएसएमटी -रत्नागिरी, पनवेल-सावंतवाडी आणि पनवेल -रत्नागिरी दरम्यान या स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. तसेच या 72 गणपती स्पेशन ट्रेन आरक्षण फुल्ल झाल्यामुळे प्रवासी संघटनांनी आणखी गणपती स्पेशल ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेकडून आणखी गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - राज्यात डेल्टा प्लसचा कोणताही नवा रुग्ण नाही - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.