ETV Bharat / city

बार्जवरील 61 मृतदेहांपैकी 31 जणांची ओळख पटली; ओळख न पटलेल्यांची होणार डीएनए टेस्ट

author img

By

Published : May 22, 2021, 6:46 PM IST

तौक्ते चक्रीवादळादरम्यान मुंबईच्या अरबी समुद्रात पी-305 ही बार्ज बुडाली. या दुर्घटनेत अनेक कर्मचाऱ्यांना नौदलाने आतापर्यत वाचवले आहे. यात 61 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

barge
बार्ज

मुंबई - तौक्ते चक्रीवादळादरम्यान मुंबईच्या अरबी समुद्रात पी-305 ही बार्ज बुडाली. या दुर्घटनेत अनेक कर्मचाऱ्यांना नौदलाने आतापर्यत वाचवले आहे. यात 61 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यातील 31 जणांची ओळख पटली असून, 28 जणांच्या नातेवाईकांनी मृतदेहाचा ताबा घेतला आहे. तर ज्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही अशा मृतदेहांचे डीएनए टेस्ट करून त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचावकार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्यास सुरुवात केली. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली. 17 मे रोजी सुरू झालेली ही मोहीम अद्यापही सुरू असून, आतापर्यंत 188 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

'बार्ज पी305'च्या कॅप्टनवर गुन्हा दाखल

अरबी समुद्रात पी-३०५ हे बार्ज बुडाल्याप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बार्जवरील अभियंते मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांनी केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चक्रीवादळाची सूचना असतानाही, कॅप्टन राकेश बल्लव याने बार्ज वेळीच न हलवता, इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. यानंतर बार्ज बुडून काही कर्मचारी जखमी झाले, तर काहींचा मृत्यू झाला. या सर्व दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा - कोरोनामुळे जगभरात एका वर्षात 30 लाख लोकांचा मृत्यू; WHO चा अहवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.