ETV Bharat / city

Malik Vs Wankhede : कथित विधानांचा वापर करून खोटी अवमान याचिका दाखल केल्याचा नवाब मलिक यांचा दावा

author img

By

Published : Feb 21, 2022, 3:38 PM IST

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Cabinet Minister Nawab Malik) यांनी ज्ञानदेव वानखेडे यांच्या अवमान याचिकेवर उत्तर (Answer to contempt petition) दाखल केले, उच्च न्यायालयाने या संदर्भात मलिकांना नोटीस बजावत कारवाई का करू नये हे स्पष्ट करण्यास सांगितले होते. मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दावा केला आहे की ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडे बद्दल केलेल्या कथित अवमानजनक विधानांच वापर करून खोटी अवमान याचिका दाखल केली.

Nawab Malik / Dnyandev Wankhede
नवाब मलिक / ज्ञानदेव वानखेडे

मुंबई: मी प्रसारमाध्यमांसमोर पत्रकार परिषदेत जे काही बोललो त्यात वानखेडे किंवा समीर वानखेडे यांचा कुठेही उल्लेख केला नाही. तरीही वानखेडे यांनी माझ्याविरोधात अवमान याचिका दाखल केली. त्यासोबत कोर्टात सादर केलेल्या माझ्या विधानांच्या उताऱ्यात स्वतःहूनच शब्द घुसडले असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. मलिकांच्या प्रतिज्ञापत्रातील म्हणण्याविषयी वानखेडे यांना प्रत्युत्तरादाखल प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देऊन न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने या याचिकेवर 28 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील वाद वाढतच आहे. याआधी मलीकांनी निकाल लागेपर्यंत वानखेडेंबाबत कोणतेही विधान करणार नाही, अशी हमी दिली असतानाही त्यांनी वानखेडेंबाबतचे वक्तव्य सुरूच आहेत. यामुळे त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करत ज्ञानदेव वानखेडे यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 28 डिसेंबर, 2 आणि 3 जानेवारी रोजी मलिकांनी पुन्हा वानखेडेंबाबत विधाने करत बदनामी केल्याचा दावा वानखेडे यांनी याचिकेत केला आहे. त्यामुळे मलिक यांच्यावर न्यायालयाचा वारंवार अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी तसेच याचिकेच्या खर्चाची रक्कम दंड म्हणून वसूल करावा, अशी मागणी वानखेडे यांनी याचिकेतून केली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात ही नव्याने याचिका दाखल केली आहे. वानखेडेच्या जातप्रमाणपत्राबाबत सध्या जातपडताळणी कमिटीकडे सुनावणी सुरू आहे. त्याबाबतही नवाब मलिकांची सोशल मीडियात टिका टिप्पणी सुरूच आहे. मुळात वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी हमी देऊनही मलिक यांच्याकडून पुन्हा बदनामी सुरूच असल्याने ज्ञानदेव यांनी हायकोर्टात ही नवी अवमान याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी दिलेली हमी मोडत वानखेडेंबाबत अनावधानाने वक्तव्य केल्याबद्दल नवाब मलिकांनी कोर्टाची माफीही मागितली होती हे विशेष.

हेही वाचा : Nilesh Rane Vs Uddhav Thackeray : त्यांच्या या कृतीवर तर जुने शिवसैनिकही नाराज - निलेश राणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.