मुंबई - मनसेच्या पहिल्या महामेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात भूमिका जाहीर केली. त्यानंतर मनसैनिकांनी अनेक ठिकाणी घुसखोरांची धरपकड करण्यास सुरुवात केली. मात्र मनसेच्या या मोहिमेला फारसे यश मिळाल्याचे चित्र नाही. यामुळे मनसेने आता 'घुसखोर कळवा; बक्षीस मिळवा', अशी हाक देत नवीन मोहीम सुरू केली आहे.
मराठीचा मुद्दा बाजूला सारत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. यानंतर त्यांनी पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. या घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका असून मुंबईत घुसखोरांचे मोहल्लेच्या मोहल्ले उभे राहिल्याचे सांगण्यात आले. या घुसखोरांना हाकलून लावा, असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक याचसोबत अन्य शहरांमध्ये घुसखोरांचा पर्दाफाश करण्याची मोहिम हाती घेतली. मात्र, मनसेच्या या मोहिमेला फारसे यश मिळाले नाही. काही ठिकाणी तर मनसेने धरपकड केलेले बंग्लादेशी हे भारतीय असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे काही दिवसानंतर संबंधित मोहीम थंडावली होती.
या घुसखोरांना शोधण्यासाठी आता मनसेने नवी शक्कल लढवली आहे. घुसखोर कळवा; बक्षीस मिळवा, अशी नवी मोहीम मनसेनेने मुंबईत सुरू केली आहे. मनसेचे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उपविभाग अध्यक्ष अखिल चित्रे यांनी ही मोहीम सुरू केली असून घुसखोरांना पकडण्यासाठी त्यांनी या मोहिमेच्या माध्यमातून थेट लोकांना साद घातली आहे.
बॅनरबाजी, समाज माध्यमांचा वापर करून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. या मोहिमेत समोर आलेल्यांनी मिळालेल्या माहितीची शहानिशा करून, सत्यता पटल्यावर हे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येणार आहे. घुसखोर असल्याचे स्पष्ट झाल्यास माहिती देणाऱ्यास पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.