ETV Bharat / city

Legislative Council elections : तर विधान परिषदेची पाचवी जागा लढणार, चंद्रकांत पाटलांचा मविआला इशारा

author img

By

Published : Jun 3, 2022, 2:53 PM IST

राज्यसभा निवडणुकीतील तिसऱ्या जागेसाठीच्या उमेदवारीवर भाजप ठाम आहे. आघाडी सरकारने राज्यसभेचा उमेदवार मागे घेण्याची मागणी भाजपने केली. त्याऐवजी विधान परिषदेची पाचवी जागा सोडू, अन्यथा परिषदेची निवडणूक सुद्धा लढवणार, असा इशारा भाजपने दिला आहे.

Chandrakant Patil
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई - राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोर लावला आहे. मात्र राज्यसभा निवडणुकीतील तिसऱ्या जागेसाठीच्या उमेदवारीवर भाजप ठाम आहे. आघाडी सरकारने राज्यसभेचा उमेदवार मागे घेण्याची मागणी भाजपने केली. त्याऐवजी विधान परिषदेची पाचवी जागा सोडू, अन्यथा परिषदेची निवडणूक सुद्धा लढवणार, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत दिला. त्यामुळे आगामी निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मविआचे प्रयत्न - राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकासआघाडी ने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंत्री सुनील केदार, शिवसेना नेते अनिल देसाई यावेळी उपस्थित होते. बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवण्यावर ठाम असल्याचे त्यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला ठणकावले आहे.

भाजपला राज्यसभा महत्त्वाची - तिसरा उमेदवार मागे घेण्याबाबत आघाडी सरकारने फडणवीस यांना गळ घातली. मात्र, भाजपला तीन जागा मिळायला हव्यात, यावर आम्ही ठाम आहोत. 11 ते 12 मध्ये आम्हाला कमी आहेत. तरीही आम्ही निवडून येऊ. त्यामुळे शिवसेनेने तिसरा उमेदवार मागे घ्यावा. विधान परिषदेबाबत नंतर विचार केला जाईल. मात्र आम्ही तिसरी जागा लढवण्यावर ठाम असून माघार घेणे आम्हाला शक्य नाही. आमच्या पक्षाला राज्यसभा महत्त्वाची आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच आघाडी सरकारने माघार न घेतल्यास विधान परिषदेतही भाजप पाचवी जागा लढवेल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. महाविकास आघाडीच्या प्रस्तावाला आम्ही प्रस्तावानेच उत्तर देणार असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या आग्रही भूमिकेमुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस रंगणार आहे.

महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश मिळेल - महाविकास आघाडीचा प्रस्ताव भाजपला दिला आहे. कोणीतरी माघार घ्यावी या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. राज्यसभा बिनविरोध झाल्याचे विधान परिषदेची पाचवी जागा भाजपला सोडण्यास महाविकास आघाडी तयार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत वाट पहावी लागेल, आमच्या प्रयत्नांना यश येईल, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.