ETV Bharat / city

coastal road project : मिरा भायंदरला मुंबई एलिव्हेटेड कनेक्टिव्हिटीने जोडणार, पालिका करणार ३१८६ कोटींचा खर्च

author img

By

Published : Oct 16, 2022, 9:27 AM IST

Updated : Oct 16, 2022, 3:42 PM IST

मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पातील ५ किलोमीटरचा शेवटचा टप्पा असलेला आणखी एक एलिव्हेटेड रस्ता मुंबई महानगरपालिकेकडून तयार करण्यात येणार आहे. सुमारे ४५ मीटर रुंद असा एलिव्हेटेड रोड हा दहिसर (पश्चिमेला) लिंक रोड ते मिरा भायंदर (पश्चिम) मुंबई महापालिकेच्या हद्दीत तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका ३१८६ कोटी रुपये खर्च करणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईत रोजगार तसेच कामधंद्याच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांना फायदा होणार आहे.

coastal road project
coastal road project

मुंबई - मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पातील ५ किलोमीटरचा शेवटचा टप्पा असलेला आणखी एक एलिव्हेटेड रस्ता मुंबई महानगरपालिकेकडून तयार करण्यात येणार आहे. सुमारे ४५ मीटर रुंद असा एलिव्हेटेड रोड हा दहिसर (पश्चिमेला) लिंक रोड ते मीरा भायंदर (पश्चिम) मुंबई महापालिकेच्या हद्दीत तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका ३१८६ कोटी रुपये खर्च करणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईत रोजगार तसेच कामधंद्याच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांना फायदा होणार आहे.

मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रकल्प - कोस्टल रोडच्या माध्यमातून ५ किमी अंतराचा एलिव्हेटेड रोड तयार करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका हद्दीत दीड किलोमीटर तर मिरा भायंदर महापालिका हद्दीत ३.५ किमी अंतराचा असा एलिव्हेटेड रोड तयार करण्याचा विचार महापालिकेचा आहे. मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. दहिसर पश्चिमेच्या कांदरपाडा मेट्रो स्टेशनला हा एलिव्हेटेड रोड सुरू होईल तर भायंदर पश्चिम येथील उत्तन रोड येथे हा रस्ता समाप्त होईल.

coastal road project
मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पातील ५ किलोमीटरचा शेवटचा टप्पा असलेला आणखी एक एलिव्हेटेड रस्ता पूर्ण होणार आहे.

प्रकल्पाचा असा होणार फायदा - एकुण ४५ मीटर रूंदीचा आणि चार लेनचा हा कोस्टल रोड विकसित करण्यात येईल. त्यासोबतच अॅम्ब्युलन्स आणि आपत्कालीन वाहनांसाठीची एक स्वतंत्र अशी लेन असणार आहे. या रस्त्यावरून दिवसापोटी ७५ हजार वाहने प्रवास करतील असा अंदाज आहे. त्यामुळे दहिसर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी ३० ते ३५ टक्क्यांनी कमी होणार आहे. दहिसरच्या खाडीच्या भागातून तसेच मिठागराच्या जागेतून या रस्त्याचा मार्ग असेल. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून कमीत कमी हानी होईल असा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून असणार आहे. तसेच पार्किंगच्या दृष्टीकोनातूनच दहिसर येथे मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हबदेखील उभारण्यात येईल. त्यामुळे ५५० वाहनांसाठीची पार्किंगची जागा उपलब्ध होईल. हा संपूर्ण प्रकल्प ४२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरण तसेच पर्यटक आकर्षित करण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.

प्रकल्पाचा खर्च ३१८६ कोटी - या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत बोली लावून यशस्वी ठरणाऱ्या कंपनीलाच सीआरझेड, मिठागर आयुक्त, पर्यारण आणि वन विभाग यासारख्या विविध यंत्रणांची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी येणारा खर्चाचा अंदाज हा २५७४ कोटी रूपये इतका मांडला आहे. तर अतिरिक्त वाढीव खर्चासह ३१८६ कोटी रूपये इतका प्रकल्पातील खर्चवाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तांत्रिक आणि अभियांत्रिकी आव्हानांमुळे रस्ता अविकसित - मीरा भाईंदर या शहरात झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. येथून मुंबईत येणाऱ्यांची संख्याही जवळपास दीड लाखांच्या आसपास आहे. येत्या काळात ही लोकसंख्या १० लाखांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सद्यस्थितीला मिरा भायंदरहून मुंबईत येणाऱ्या नागरिकांसाठी केवळ दोनच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न रेल्वे या दोनच मार्गांची उपलब्धतता आहे. त्यामुळे या भागातून मुंबईकडे येताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. मुंबई महानगरपालिका तसेच मीरा भायंदर महापालिकेने आपल्या विकास आराखड्यात पुरेशी अशी तरतूद करूनही तांत्रिक आणि अभियांत्रिकी आव्हानांमुळे हा रस्ता विकसित झाला नाही.

Last Updated : Oct 16, 2022, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.