मुंबई - प्रभू रामाचे नाव घेत आणि हिंदुत्त्वाची डरकाळी फोडत शिवसेना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या ( Shivsena Contest UP Assembly Election ) आखाड्यात उतरली आहे. यावेळी शिवसेना पश्चिमी उत्तर प्रदेश, अवध, बुंदेलखंड आणि पूर्वांचल या सर्व भागांमध्ये निवडणुका लढवणार आहेत. आपल्याला नक्कीच उत्तर प्रदेशातली जनता मदत करील, असा विश्वास शिवसेना व्यक्त करते आहे. तर शिवसेना ही जिंकण्याच्या स्थितीत नसून मते घेऊन काही उमेदवारांना पाडण्याच्या स्थितीत असेल, असं राजकीय पक्षांचे मत आहे. मात्र, शिवसेनेचा पूर्वइतिहास आणि सध्याची स्थिती पाहता शिवसेनेच्या अस्तित्वामुळे कुणालाही फायदा अथवा तोटा होण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे. शिवसेना आणि समाजवादी पार्टीची छुपी युती झाल्याचं म्हटलं जात असलं तरी त्यात तथ्य नसून त्याचा फायदा होण्याची शक्यताही कमी व्यक्त केली जात आहे.
शिवसेना जिंकण्यासाठी लढणार - दुबे
शिवसेना उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा 50 ते शंभर जागा लढवणार असून प्रत्येक टप्प्यागणिक उमेदवार निश्चित केले जाणार असल्याने आत्ताच नेमका आकडा सांगता येणार नाही, असे शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी सांगितले. शिवसेना हा सुरुवातीपासूनच हिंदुत्ववादी पक्ष असून प्रभू रामाच्या मंदिरासाठी आग्रही असलेला पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे हे उत्तर प्रदेशातली जनता जाणते. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशातील शेतकरीवर्ग विशेषतः पश्चिमी उत्तर प्रदेश आणि पूर्वांचल मधील शेतकरी शिवसेनेसोबत नक्की उभे राहतील. आम्ही कोणत्याही पक्षाला फायदा करून देण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढत आहोत असेही दुबे म्हणाले. तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लढाईच्या मैदानात जिंकण्यासाठी उतरण्याचे आदेश दिले आहेत त्याच पद्धतीने निवडणुका लढल्या जातील असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
अस्तित्त्वासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा धोका नाही - सिंह
शिवसेना नेहमीच उत्तर प्रदेशात आपल्या अस्तित्वाची लढाई देत असते. आतापर्यंत या पक्षातील सर्व उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त होण्याचा विक्रम आहे. तोच आता ही सुरू राहील. शिवसेनाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वळचणीला गेल्याने त्यांचे हिंदुत्व किती बेगडी आहे, हे सर्वांना कळून चुकले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील जनता शिवसेनेला पुन्हा थारा देणार नाही. त्यामुळे त्यांनी कोणाला फायदा देण्याचा जरी विचार केला, तरी शक्य होणार नाही. भाजपाला काहीही नुकसान होणार नाही, असे भाजपा प्रवक्ता अजय सिंह यांनी सांगितले.
शिवसेना-सपा युती नाही- शेख
शिवसेना आणि समाजवादी पार्टीची विचारधारा वेगळी आहे, आम्ही नेहमीच जातीयवादी पक्षांना विरोध करीत आलो आहोत. त्यामुळे शिवसेनेसोबत उघड काय पण छुपी युती सुद्धा केली जाणार नाही. त्यामुळे शिवसेना किती मते घेते यांनी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. या वेळी नक्कीच सपाला अधिक जागा मिळतील, असा विश्वास आमदार रईस शेख यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचा उत्तर प्रदेशातील पूर्वेतिहास -
शिवसेनेने २०१२ मध्ये उत्तर प्रदेशात ३१ जागांवर उमेदवार उभे केले होते. यावेळी सर्व ३१ आमदारांची अमानत रक्कम जप्त झाली होती व पक्षाला एकूण २१७१४ मते मिळाली होती. २०१७मध्ये शिवसेनेने ५७ जागांवर उमेदवार उभे केले होते. यापैकी ५६ जागांवरील उमेदवारांची अमानत रक्कम जप्त झाली होती, तर पक्षाला एकूण ८८ हजार ५९५ मते मिळाली होती. यावेळी शिवसेनेला ०.१० टक्के इतकी मते मिळाली होती.
हेही वाचा - Shivsena Mla Dilip Lande : शिवसेना आमदार दिलीप लांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा