मुंबई - मुंबईत एकीकडे गणेश विसर्जन सुरू असताना अनंत चतुर्दशीदिनी म्हणजेच १९ सप्टेंबरला रात्री ९ च्या सुमारास ५ मुले समुद्रात बुडाली. त्यापैकी २ जणांना वाचवण्यात यश आले. इतर ३ जणांचा शोध घेताना काल सोमवारी २ जणांचा तर आज मंगळवारी पहाटे एकाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे मृतांची संख्या ३ झाली आहे. अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
५ मुले बुडाली
मुंबईत गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना आज रविवारी रात्री ९ च्या सुमारास विसर्जनदरम्यान ५ मुले वर्सोवा जेट्टी येथे गेली होती. समुद्रात ही पाचही मुले बुडाली. मुले समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व गावकऱ्यांनी शोध घेतला असता शिवम रंजनलाल निर्मळ (१९) आणि विजय रोहिदास मराठे (१८) या २ जणांना शोधण्यात यश आले आहे. शिवम याच्यावर एचबीटी रुग्णालयात तर विजय याच्यावर कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुले समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, नेव्हीचे डायव्हर्स, लाईफ गार्ड यांनी शोध मोहीम राबवली. समुद्रात ज्या ठिकाणी मुले बुडाली त्या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरात फेरी बोट वापरून शोधकार्य सुरू केले. मात्र, त्या ३ मुलांचा शोध सोमवारी पहाटे पर्यंत लागला नव्हता.
३ मुलांचा मृत्यू
काल सोमवारी २० सप्टेंबर रोजी शोध मोहीम सुरू असताना दोन मुलांचा शोध लागला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा आधीच मृत्यू झाल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. शुभम रंजनलाल निर्मळ (१८) व संजय हिरामन तावडे (२०) अशी या मृत मुलांची नावे आहेत. तर, आज मंगळवारी २१ सप्टेंबरला पहाटे आणखी एकाचा शोध लागला असून त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचाही मृत्यू झाला आहे. विजय संदिप पाटील (२१) असे त्याचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.