कोल्हापुर - राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र राज्यातील धार्मिक स्थळ आणि मंदिरे बंद असल्याने त्यावर अवलंबून असणारे फेरीवाले, छोटे-मोठे व्यापारी यांची अवस्था दयनीय झाली आहे. "एकीकडे कोरोनाने मृत्यू झाल्याने समोर दिसत आहे, तर दुसरीकडे बेकारीमुळे उपाशी मरण्याची वेळ आम्हावर आली आहे", अशी भावना फेरीवाले व व्यापाऱ्यांची आहे. त्यामुळे आता मंदिरे खुली करून भक्तांची रेलचेल सुरू करावी, अशी मागणी फेरीवाल्यांकडून केली जात आहे.
मंदिरासमोरील फेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प
राज्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 'ब्रेक दी चेन' मोहिम सुरू केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहिल्यानंतर निर्बंधही आणखीन कडक करण्यात आले. मात्र राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. हळूहळू सर्व निर्बंध शिथिल करत व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. मात्र मंदिरासमोरील फेरीवाल्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यांची अवस्था बेकारीची झाली आहे. राज्य सरकारने मंदिरे सुरू करून आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख मंदिरावर सुमारे १० हजार जणांचा चरितार्थ
कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर शिवाय श्री क्षेत्र ज्योतिबाचे मंदिर, कुरुंदवाड येथील नरसिंह वाडी, खिद्रापूर, पट्टणकडोलीतील बिरदेव, आदमापूर येथील श्री बाळूमामा यासह अन्य ठिकाणी पर्यटकांची नेहमी ये जा असते. जवळपास १० हजार पेक्षा अधिक फेरीवाले, छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापारी यावर अवलंबून आहे. दररोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ५ एप्रिल रोजी कडक निर्बंध जाहीर केले आहेत. पहिल्या लॉकडाऊन मध्ये पूर्ण वर्ष वाया गेले, निदान आतातरी पोटापुरते मिळवू द्या, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
व्यापाऱ्यांमध्ये नाराजी
दरम्यान, गेल्या वर्षभराच्या कालावधीत मंदिर परिसरातील दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. जानेवारीपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतल्यानंतर काही अंशी व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा मंदिरे बंद झाल्याने मंदिर परिसरातील दुकाने देखील बंद केली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
हेही वाचा - राजकारणाला बाजूला ठेऊन गावाच्या एकीने साकारतेय देवीचे 'मंदिर'