नवी दिल्ली - भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भारतीय उद्योग समुदायाने शोक प्रगट केला आहे. तसेच जेटलींच्या नातेवाईकांबद्दल सहवेदना व्यक्त केली आहे.
अरुण जेटलींच्या निधनाने किती नुकसान झाले आहे, हे शब्दात सांगता येत नाही असे ट्विट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
जेटलींच्या जाण्याने चांगला विचार देणारे, मार्गदर्शक, प्रेरक असे असा आपला आवाज हरविल्याचे केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट केले आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अरुण जेटलींच्या अकाली जाण्याने दु:ख व्यक्त केले.
जेटलींचा परिचय झाल्याने आयुष्य समृद्ध झाल्याची प्रतिक्रिया नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी दिली.
देशाच्या कल्याणासाठी बांधील व एकनिष्ठ व्यक्ती हरविल्याचे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले, मी त्यांना नमन करतो. त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. ते आपल्या विचारांशी पूर्ण आयुष्य देशासाठी बांधिल राहिले.
शिओमी इंडियाचे मनू कुमार जैन यांनी जेटली यांच्या निधनाने दु:ख झाल्याचे म्हटले.
केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी जेटलींच्या कुटुंबाबद्दल सांत्वन व्यक्त केले. सर्व देश हा दु:खात असल्याचे म्हटले.
जेटलींच्या जाण्याने नेहमीच पोकळी जाणवणार असल्याचे माजी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभुंनी ट्विटमध्ये म्हटले. त्यांचे काम व त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.