बंगळुरु - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांनी लॉकडाऊनदरम्यान राज्यात असलेल्या शांततापूर्ण आणि आनंदी वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले. यासोबतच लॉकडाऊनदरम्यान करण्यात आलेली दारुबंदी हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे, आता सहजरित्या दारुबंदी करणे शक्य असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना पाटील यांनी एक पत्र लिहिले. त्यात ते म्हणाले, की राज्यात पूर्णपणे दारुबंदी करण्यासाठी हीच एक उत्तम संधी आहे. दारुबंदीबाबतचा निर्णय घेत राज्याला व्यसनमुक्त करण्यासाठी हे एक मोठे पाऊल असेल. 66 वर्षीय आमदार पाटील म्हणाले, राज्यात दारुची विक्री करण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी. यामुळे, गांधीजींचे व्यसनमुक्त समाजाचे स्वप्न पूर्ण होऊन महसूल निर्मितीकडे अधिक लक्ष केंद्रीत होईल.
लॉकडाऊनदरम्यान दारुची दुकाने बंद आहेत. अशात दारूचे व्यसन असणारे लोक सध्या घरीच वेळ घालवत असून पुन्हा एकदा प्रेम, आपुलकी, त्याग ही मूल्य शिकत आहेत. दारूबंदीमुळे आपण एक आदर्श समाज घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, असे पाटील म्हणाले. कुटुंबांमध्ये शांतता टिकवून ठेवण्याशिवाय या तात्पुरत्या दारुबंदीमुळे लाखो लोकांच्या प्रकृतीतही सुधारणा आली आहे. त्यामुळे, वैद्यकीय खर्चामध्येही कमी आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.