रांची - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार 85 दिवसांपासून गायब आहेत. लोक भुकेने मरत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना राजकारणासाठीच लोकांची आठवण येते, अशी टीका बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी रांची येथे केली. राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी तेजस्वी यादव रांचीमध्ये आले होते.
गरीब मजूर आजही पायी चालत आहेत, काही जण भुकेने व्याकुळ होऊन जीव गमावत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना मजुरांची काळजी नाही. गरीब लोकांनी मुख्यमंत्र्यांना मत देऊन विजयी केले. पण संकटाच्या वेळी त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणीही नाही, असे तेजस्वी यादव म्हणाले. ऑनलाईन सभा घेणाऱ्या भाजपवर देखील यादव यांनी टीका केली.
लालू प्रसाद यादव यांचा 73 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी तेजस्वी यादव रांचीमध्ये आले होते. लालू प्रसाद यादव गरिबांचे तारणहार आहेत, असे तेजस्वी यादव म्हणाले.