नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अफगाण - तालिबान शांतता परिषदेत सहभाग घेतला. यावेळी जयशंकर यांनी भारत आणि अफगाणिस्तानमधील ऐतिहासिक संबंध आणि सहकार्य अधोरेखित केले. यावेळी अफगाणिस्तानच्या विकासासाठी 400 योजनाचा उल्लेख केला. या योजना दोन्ही देशाच्या द्विपक्षीय संबंधाच्या साक्षी आहेत. तसेच महिला आणि अल्पसंख्याकांचे हित लक्षात घेऊन शांतता चर्चा झाली पाहिजे, असे जयशंकर म्हणाले.
अफगाणिस्तानाच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे. शांतता चर्चा मानवी हक्क आणि लोकशाहीला चालना देणारी असावी, असे जयशंकर म्हणाले. तसेच अफगाणिस्तानच्या मातीचा भारताच्याविरोधात कट रचण्यासाठी कधीच वापर होऊ नये, ऐवढीच आमची अपेक्षा आहे. अफगाणिस्तानाशी भारताची मैत्री मजबूत आणि अतूट आहे. आतापर्यंत दोन्ही देश चांगले शेजारी राहिले असून कायमच राहतील, असेही ते म्हणाले.
अमेरिका आणि तालिबान यांच्यात सुमारे दोन दशके चाललेल्या युद्धानंतर शांतता करार झाला आहे. अफगाणिस्ताबाबतीत भारताची सातत्यपूर्ण तटस्थ राजकीय भूमिका राहिली आहे. भारताने अफगाणिस्तानात रस्ते बांधणीसोबतच, शाळा आणि संसदेची इमारत बांधल्याने त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण फरक पडला आहे.