कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजधानीतील नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले. यावेळी कार्यक्रमात काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आजाद उपस्थित होते. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून हे पक्षाच्या नियमांच्या विरोधात असल्याचं म्हटलं. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. तसेच यावर अंतिम निर्णय पक्ष प्रमुख घेतील. गुलाम नबी आजाद यांनी क्रायक्रमात उपस्थिती का लावली, यावर त्यांना स्पष्टीकरण मागितले जाऊ शकते, असेही चौधरी म्हणाले.
पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पक्ष सोडून द्यायला हवा. त्यांनी आपला पक्ष निर्माण करावा, असेही चौधरी म्हणाले. तसेच याप्रकरणी बंगालमधील विधिमंडळ दलाचे नेते असित मित्रा यांनी प्रतिक्रिया दिली. अखिल भारतीय काँग्रेस समिती याप्रकरणी तपासणी करत आहे. यावर ते योग्य निर्णय घेतील. मात्र, या प्रकरणाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. हे प्रकरण प्रकरण सहज सोडवले जाऊ शकते, असे ते म्हणाले.
महासचिव पदाच्या जबाबदारीमधून मुक्त -
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद यांच्या भावी भूमिकेविषयी पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात विविध तर्क- वितर्क लावले जात आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी गुलाम नबी आजाद यांना महासचिव पदाच्या जबाबदारीमधून मुक्त केले होते. काँग्रेस पक्षातील २३ दिग्गज नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षात फेरबदल करण्याची मागणी करणारे पत्र पाठवले होते. त्यामध्ये आजाद यांचा समावेश होता. म्हणूनच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे म्हटलं जात होतं.
सोनिया गांधींची सामंजस्याची भूमिका -
उत्तर प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष निर्मल खत्री यांनी या पत्राच्या प्रकरणावरून आझाद यांच्यावर टीका केली होती. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे आणखी एक नेते नसीब पठाण यांनी या प्रकरणावरून आजाद यांची पक्षातून हाकलपट्टी करण्याची मागणी केली होती. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत थोडीसी सामंजस्याची भूमिका घेतली. तसेच आजाद यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे प्रकर्षाने लक्ष दिले जाईल, असे आश्वासनही दिले होते.
हेही वाचा - संसदेच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली पूजा