महाराष्ट्र

maharashtra

"जे समोर लढू शकत नाहीत ते फेक व्हिडिओ...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Lok Sabha Election 2024

By PTI

Published : Apr 29, 2024, 9:00 PM IST

Updated : Apr 29, 2024, 9:14 PM IST

PM Modi Satara Sabha : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड येथे झालेल्या निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली. तसंच जे समोर लढू शकत नाहीत ते फेक व्हिडिओ पसरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

PM Narendra Modi said Rivals unable to take us on directly now spreading fake videos
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातारा सभा

कराड (सातारा) PM Modi Satara Sabha : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सातत्यानं सभा घेत आहेत. सोमवारी (29 एप्रिल) पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड येथे निवडणूक सभेला संबोधित केलं. यावेळी बोलत असताना मोदींनी विविध मुद्द्यांवरुन विरोधकांवर टीका केली. तसंच भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारला तोंड देऊ न शकलेले राजकीय प्रतिस्पर्धी आता सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ पसरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही यावेळी मोदींनी केला.

सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न :यावेळी मोदींनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या बनावट व्हिडिओंविषयी भाष्य केलं. तसंच अशा फेक व्हिडिओंपासून लोकांना सतर्क राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं. पुढं ते म्हणाले की, "विरोधक एआयचा वापर करून माझा, अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासारख्या नेत्यांच्या वाक्यांचा विपर्यास करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. तंत्रज्ञानाचा वापर करून हे लोक माझ्या आवाजात फेक व्हिडिओ बनवताय, त्यामुळं धोका निर्माण होत आहे. जर तुम्हाला कोणताही फेक व्हिडिओ दिसला तर पोलिसांना याची माहिती द्यावी." तसंच पुढील एका महिन्यात विरोधक मोठी घटना घडवण्याची योजना आखत असल्याचा दावाही मोदींनी केला.

काँग्रेसवर हल्लाबोल : "अशा फेक व्हिडिओंपासून समाजाला वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. मी निवडणूक आयोगाला विनंती करतो की अशा बनावट व्हिडिओंमागे असलेल्यांवर कठोर कारवाई करावी," असं मोदी म्हणाले. पुढं काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, काँग्रेसनं सैनिकांच्या कुटुंबांना 40 वर्षे 'वन रँक वन पेन्शन' योजनेपासून वंचित ठेवलं. संपूर्ण भारतातील दलितांना आरक्षण मिळालं असताना, काश्मीरमधील दलितांना काँग्रेसनं व्होट बँकेच्या राजकारणासाठी कोट्यापासून वंचित ठेवलं. पण मी जिवंत असेपर्यंत संविधान आणि धर्मावर आधारित आरक्षण बदलू देणार नाही, असं आश्वासन मोदींनी दिलं.

हेही वाचा -

  1. "गुजरातला उद्योगधंदे पळवताना मोदींना महाराष्ट्राची आठवण...", नाना पटोलेंचा हल्लाबोल - Nana Patole
  2. कलंकित काँग्रेस सत्ता हिसकावण्याचे स्वप्न पाहत आहे, पण इंडिया आघाडी दोन टप्प्यातच पराभूत : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Lok Sabha Election 2024
  3. पंतप्रधान मोदी सलग दोन दिवस राज्यात करणार झंझावती प्रचार , जाणून घ्या राज्यातील राजकीय परिस्थिती - PM MODI MAHARASHTRA visit
Last Updated :Apr 29, 2024, 9:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details