महाराष्ट्र

maharashtra

"महाराष्ट्र भटकत्या आत्म्यांचा शिकार...", शरद पवारांचं नाव न घेता पंतप्रधान मोदींची टीका - Lok Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 10:47 PM IST

PM Modi Pune Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज (29 एप्रिल) पुण्यात सभा पार पडली. या सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय अस्थिरतेवर भाष्य करताना नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार बनलाय, असं म्हटलंय.

PM Narendra Modi Criticized Sharad Pawar During Speech in Pune
शरद पवार आणि नरेंद्र मोदी

पुणे PM Modi Pune Sabha :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सातत्यानं सभा घेत आहेत. आज (29 एप्रिल) पुण्यात त्यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. "महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय. या आत्म्यांचं स्वत:चं काम पूर्ण नाही झालं तर इतरांचंही काम बिघडवतात", असं मोदी म्हणालेत.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी? : यावेळी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "समाजात काही भटकते आत्मे असतात. ज्यांची इच्छा पूर्ण होत नाही आणि ते भटकत असतात. आपला महाराष्ट्र देखील अशा आत्म्यांचा शिकार झालाय. 45 वर्षांपूर्वी या राज्यातील एका नेत्यानं या खेळाची सुरुवात केली, आणि त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही. फक्त विरोधकांना नाही तर कुटुंबाला देखील अस्थिर करण्याचं काम या आत्म्यानं केलंय", असं म्हणत मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता टीका केली.


काँग्रेसवर साधला निशाणा : यावेळी काँग्रेसवर टीका करत मोदी म्हणाले की, "काँग्रेसनं देशात 60 वर्षे राज्य केलं, पण देशातील अर्ध्या लोकांकडं बेसिक सुविधा नव्हती. आम्ही केवळ 10 वर्षांमध्ये लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या. आज मेट्रो, पालखी मार्ग, समृध्दी महामार्ग, विमानतळ, वंदे भारत ट्रेन हे सर्व आधुनिक भारताचं चित्र आहे. मागील 10 वर्षांपूर्वी महागाई आणि भ्रष्टाचार करत जास्त कर आकारण्यात यायचा. आम्ही सत्तेत आल्यावर महागाई आणि भ्रष्टाचार नियंत्रणात आलेत." पुढं ते म्हणाले की, "काँग्रेसनं नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय. तसंच भारताच्या संविधानालाही त्यांचाच विरोध आहे. इंडिया आघाडीतील लोक संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसताय. देशात 10 वर्षांपूर्वी आतंकवादी हल्ले होत होते ते आज बंद झालेत. हे सगळं मोदींची गॅरंटी आहे", असं देखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. "गुजरातला उद्योगधंदे पळवताना मोदींना महाराष्ट्राची आठवण...", नाना पटोलेंचा हल्लाबोल - Nana Patole
  2. कलंकित काँग्रेस सत्ता हिसकावण्याचे स्वप्न पाहत आहे, पण इंडिया आघाडी दोन टप्प्यातच पराभूत : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Lok Sabha Election 2024
  3. पंतप्रधान मोदी सलग दोन दिवस राज्यात करणार झंझावती प्रचार , जाणून घ्या राज्यातील राजकीय परिस्थिती - PM MODI MAHARASHTRA visit

ABOUT THE AUTHOR

...view details