महाराष्ट्र

maharashtra

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आजपासून सुरू, देशातील ९४ मतदारसंघांसह राज्यातील ११ मतदारसंघांकरिता भरता येणार नामांकन - lok Sabha election 2024

By PTI

Published : Apr 12, 2024, 10:23 AM IST

Updated : Apr 12, 2024, 11:04 AM IST

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमदेवारांच्या नामांकन प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामध्ये देशातील 94 मतदारसंघासह महाराष्ट्रातील 11 मतदारसंघाचा समावेश आहे.

Lok Sabha election
Lok Sabha election

मुंबई-लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 12 राज्यांमधील 94 मतदारसंघांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नामांकन प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. त्याबाबत राष्ट्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रपतींच्या वतीनं अधिसूचना जारी केली. तिसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीच्या उमदेवारीचा अर्ज भरण्यासाठी १९ एप्रिल ही शेवटची तारीख आहे. मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघातील "स्थगित" मतदानासाठी आणखी एक अधिसूचना जारी करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. बसपाच्या उमेदवाराच्या मृत्यूमुळे बैतूल लोकसभा जागेवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. एखाद्या राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाच्या उमेदवाराचा मतदानापूर्वी मृत्यू झाल्यास, पक्षाला नवीन उमेदवार निवडण्यासाठी निवडणूक पुढे ढकलली जाते. बैतूल मतदारसंघात यापूर्वी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार होते. मात्र, ही निवडणूक आता पुढे ढकलली आहे.

4 जूनला लागणार निकाल-लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात कर्नाटक, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे. काश्मीर, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि जम्मू या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सात टप्प्यातील मतदान 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीचे कसे चित्र आहे?-महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. दुसरीकडं महायुतीमध्ये अद्याप 10 जागांवर जागा वाटपावरून संभ्रम आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या 3 जागांवर महायुतीला अद्याप उमेदवार निश्चित करता आला नाही. बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवित आहेत. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. पंतप्रधान मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी चंद्रपूर आणि रामटेकमध्ये प्रचारसभा घेतल्या आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमध्ये महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.

हेही वाचा-

  1. मनसेच्या एन्ट्रीमुळं नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराला फायदा होणार? काय म्हणाले राजकीय तज्ज्ञ? - lok sabha election 2024
  2. देशात निवडणुकीचे वारे, मात्र ठाण्यात सर्वकाही सामसूम; अख्ख्या भारतात एकमेव मतदारसंघ शांत - Lok Sabha Election 2024
  3. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप रखडलेला; मुंबईच्या जागेवर कुणाची वर्णी लावावी? भाजपा चिंतेत - Lok Sabha Election 2024
Last Updated :Apr 12, 2024, 11:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details