बुलडाणा :टोमॅटोचे भाव वाढल्याने अभिनेता सुनील शेट्टी यांनी जागतिक विषय केला आहे. सुनील शेट्टी यांनी टोमॅटोचे भाव वाढल्याने त्यांच्या पत्नीचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे, असे म्हटले होते. जर भाव वाढले असतील तर सुनील शेट्टी यांनी टोमॅटो खाऊ नये. असे केल्यास ते काही मरणार नाही. मात्र, शेतकऱ्यांची टिंगल-टवाळी करू नये, अशा शब्दात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अभिनेता सुनील शेट्टीला खडसावले आहे. दोन-चार वर्षांत एखादाच महिना असा येतो की, टोमॅटो किंवा कांद्याचे भाव वाढतात. त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात. इतरवेळी भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यावा लागतो; मात्र शहरी भागातील लोक हे त्यांचे भांडवल करतात. त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते, अशा शब्दात रविकांत तुपकर यांनी अभिनेता सुनील शेट्टी यांना खडसावले आहे.