महाराष्ट्र

maharashtra

कोकणात पहिल्यांदाच बुश पेपर मिरी पिकाची व्हर्टिकल गार्डन पद्धतीने लागवड

By

Published : Jun 6, 2020, 2:27 PM IST

Updated : Jun 6, 2020, 2:52 PM IST

बुश पेपर वनस्पतीची लागवड करणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. काळी मिरी जवळपास 5 ते 6 मीटरपर्यंत उंच वाढते. मात्र, बुश पेपरमुळे काळ्या मिरीची उंची नियंत्रित होऊन तिचे मुबलक उत्पादन घेणे आणि उत्पन्न वाढवणे सोपे जाणार आहे. प्रामुख्याने अन्य झाडांच्या आधाराने वाढणारी वेलवर्गीय मिरी काढताना अनेकवेळा शेतकऱ्यांना अपघात झाले आहेत. मात्र, बुश पेपर मिरीमुळे 'मिरीची काढणी' सुलभ होते.

sindhudurg latest news  black pepper plantation sindhudurg  black pepper farming  काळी मिरी शेती सिंधुदुर्ग  सिंधुदुर्ग लेटेस्ट न्युज  काळी मिरी शेती कोकण
कोकणात पहिल्यांदाच बुश पेपर मिरी पिकाची व्हर्टिकल गार्डन पद्धतीने लागवड

सिंधुदुर्ग - कोकणात मसाला पिकांची शेती सुरू केली, तर शेतकऱ्यांच्या नगदी उत्पन्नात नक्की वाढ होईल. यासाठीच देवगड तालुक्यातील पोयरे गावातील शेतकरी राजन राणे सध्या मेहनत घेत आहेत. गेली ५ वर्षे ते प्रयोग करत असून, त्यांना अपेक्षित यशही आले आहे. त्यांनी कोकणात प्रथमच बुश पेपर मिरीची व्हर्टिकल गार्डन पद्धतीने लागवड केली आहे. आपल्या घराच्या अंगणातही या पद्धतीने मिरीचे उत्पन्न घेऊ शकतो, असे राणे यांचे म्हणणे आहे. त्यांच्या काळ्या मिरीच्या शेतीची चांगलीच चर्चा आहे.

कोकणात पहिल्यांदाच बुश पेपर मिरी पिकाची व्हर्टिकल गार्डन पद्धतीने लागवड

बुश पेपर वनस्पतीची लागवड करणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. काळी मिरी जवळपास 5 ते 6 मीटरपर्यंत उंच वाढते. मात्र, बुश पेपरमुळे काळ्या मिरीची उंची नियंत्रित होऊन तिचे मुबलक उत्पादन घेणे आणि उत्पन्न वाढवणे सोपे जाणार आहे. प्रामुख्याने अन्य झाडांच्या आधाराने वाढणारी वेलवर्गीय मिरी धरल्यानंतर काढताना अनेकवेळा शेतकऱ्यांना अपघात झाले आहेत. मात्र, बुश पेपर मिरीमुळे 'मिरीची काढणी' सोप्पी जाते. शिवाय एकावर एक कुंड्या रचून लागवड केली असल्यामुळे जास्त रोप लावता येतात व उत्पादनही अधिक मिळते.

राजन राणे यांनी एकावर एक अशा पाच कुंड्या रचून त्याचा व्हर्टिकल पिलर तयार केला आहे. पंधरा बाय पंधरा फुटाच्या जागेत, असे चार पिलर उभे केलेत. एका कुंडीत ४ रोप, असे प्रत्येक पिलरवर बुश पेपर मिरीची २० रोपे लावली आहेत. या चार पिलरवर लावलेल्या रोपांच्या माध्यमातून कमीतकमी १०० किलो मिरी मिळते, असे राजन राणे सांगतात. विशेष म्हणजे, देवगडच्या कातळावर राणे यांनी आपली मिरी बाग फुलवली आहे.

कोकणात काळ्या मिरीची शेती वाढली, तर त्याचा इथल्या शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारण्यास नक्कीच फायदा होणार आहे. आंबा आणि काजूच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेले कोकण काळ्या मिरीच्या उत्पादनासाठी ओळखले जावे, यासाठी बुश पेपरचा वापर नक्कीच कामी येणार आहे, असा विश्वास राजन राणे यांना वाटतो. कोरोनामुळे कोकणातील अनेक मुंबईकर आपल्या गावात परत आले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत, अशा चाकरमान्यांनी आता शेतीच्या शास्त्रीय लागवडीकडे वळावे आणि स्वतःला समृद्ध करावे, असे राणे यावेळी बोलताना म्हणाले.

Last Updated : Jun 6, 2020, 2:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details