सातारा -जनतेतून प्रतिक्रिया उमटल्यानंतर कारवाई केली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा अवमान करण्याचे धाडस कोणी केले नसते. उद्या हे नालायक महाराजांना शिवज्या म्हणायला कमी करणार नाहीत. जर सन्मान ठेवता येत नसेल तर शिवाजी महाराजांचे नावच पुसून टाका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
.. तर प्रकरणच दाबले असतेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाविरोधात मी आवाज उठवला नसता तर हे प्रकरणच दाबले असते, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. आम्ही आंदोलन करतोय म्हणणारे आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे बोलले असतील. माझ्यावर टीका केल्याशिवाय काही लोक मोठे होऊ शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी आमदार शिवेंद्रराजेंना लगावला.
अवमानाची लोकांनी दखल घेतली लोक हेच लोकशाहीतील राजे आहेत. पक्ष कुठलाही असो. तो शिवाजी महाराजांपेक्षा मोठा नाही. छत्रपतींच्या अवमानाची लोकांनी दखल घेतली आहे. आज कुठल्याच पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल ठोस भूमिका घेतलेली नाही. लाज वाटली पाहिजे सगळ्यांना, असे खासदार उदयनराजेंनी सुनावले.
राजवाड्यात राहायचा अधिकार नाहीछत्रपतींच्या अवमानाबद्दल आक्रोश करायला रायगडला जावे लागले. समाधीपुढे हात जोडून उभे राहायला लागले. खरे तर त्यांचा जयजयकार करत गेलं पाहिजं होतं. आमच्या आंदोलनामागे काही तरी राजकारण आहे, असे जे म्हणत आहेत, त्यांना आणि मला वाड्यात राहायचा अधिकारच नाही. आरोप करणारे नाव लावणार आणि फक्त राजकारण करणार, असा टोलाही उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजेंना लगावला.