कराड ( सातारा ) -शिवसेना फोडण्यामागे भाजपचे कुटील कारस्थान आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवले की शिवसेनेला पडणारी हिंदुत्ववादी मते आपसूक भाजपच्या पारड्यात येतील. त्यातून भाजप पुन्हा संघटनात्मक पातळीवर मजबूत होईल, हा त्यामागे उद्देश आहे. त्यामुळे शिवसेनेचे चिन्ह गोठवले गेले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ते कराडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ( Prithviraj Chavan on Shivsena Symbol Dhanushyaban ) होते.
'आठ वर्षात ईडीचे 2900 छापे' -पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मनी लॉन्ड्रिंग कायद्याची निर्मिती काँग्रेसच्या काळात झाली. त्याअंतर्गत ईडीची स्थापना झाली. काँग्रेसच्या काळात केवळ 27 छापे टाकून दोषींवर कारवाई झाली. मात्र, भाजपने त्यांच्या आठ वर्षांच्या काळात तब्बल 2900 छापे टाकले. त्या छाप्यात एकही आरोपपत्र दाखल नाही. एकावरही गुन्हा दाखल नाही. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी भाजपकडून ईडीचा वापर केला जात आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केल आहे.