महाराष्ट्र

maharashtra

Nashik Camels : अखेर पोलीस एस्कॉर्टमध्ये नाशिकहून राजस्थानकडे उंट रवाना

By

Published : May 19, 2023, 11:03 PM IST

camels

नाशिकच्या चिंचोळे भागातील पांजरपोळा येथे आश्रयासाठी ठेवलेल्या 111 पैकी बारा उंटांचा मृत्यू झाला आहे. केवळ 99 उंट या ठिकाणी उरले होते. काल राजस्थान होऊन या उंटाना घेऊन जाण्यासाठी रायका नाशिक मध्ये दाखल झाला होता. अखेरीस आज शुक्रवारी हे उंट पांजरपोळा येथून राजस्थानच्या दिशेने रवाना झाले.

नाशिकहून राजस्थानकडे उंट रवाना

नाशिक :एक उंट प्रवेशद्वारावरच जखमी झाल्याने त्यास पांजरपोळा येथेच ठेवण्यात आले. 98 उंट पोलीस एस्कॉर्टमध्ये राजस्थानकडे रवाना करण्यात आले. रोज 25 किलोमीटर प्रवास करून तब्बल 25 दिवसानंतर या उंटांचा कळप राजस्थानला पोहोचणार आहेत. 4 मे रोजी तस्करीसाठी जात असलेल्या उंटाची माहिती नाशिकच्या प्राणी मित्रांना मिळाली होती. त्यानंतर 111 उंटांना जिल्हा प्रशासनांनी ताब्यात घेत, उंटांच्या संगोपनाची जबाबदारी नाशिक पांजरपोळा संस्थेला दिली होती. मात्र, हजारो किलोमीटर लांब पायपीट करून आल्यानं वातावरणातील बदलामुळे 111 पैकी 12 उंटांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूची संख्या लक्षात घेत प्राणी मित्रांसह पांचरपोळा संस्थेने उंट राजस्थानला पुन्हा घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र व्यवहार केला होता. यानंतर राजस्थान येथील कॅमल सेंचुरीया संस्थेने या उंटांच्या संगोपनाची जबाबदारी घेणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले. त्यानुसार राजस्थान येथून उंटांना संभाळणारे सात रायका गुरुवारी पांजरपोळा येथे दाखल झाले होते. सकाळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी गिरीश पाटील, डॉक्टर साखरे, डॉक्टर वैशाली थोरात यांनी पांजरपोळा येथे भेट देत उंटांची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्र रायकांना दिल्यानंतर हे उंट राजस्थानकडे रवाना झाले. रोज 25 किलोमीटर इतका प्रवास करून हे उंट राजस्थान येथे पोहोचणार आहे. यासाठी तब्बल 10 लाखांचा खर्च येणार आहे..

सात जणांवर गुन्हा दाखल :अन्नपाण्याविना हे उंट शेकडो किलोमीटरवर अंतरावरून पायी चालवून आणल्याने त्यांना अशक्तपणा आल्यामुळे त्यातील आठ उंटांचा मृत्यू झाला. उंटांच्या छळाबाबत ओरड झाल्यानंतर, थेट राज्यपालांनी याची दखल घेतल्यानंतर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख शहाजी उमप यांनी चर्चा करून दिंडोरी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुटिया सय्यद, अस्लम सय्यद, शहाणूर सय्यद, सलीम सय्यद, इजाज सय्यद, दीपक सय्यद, शाहरुख सय्यद या सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र लहारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला..


उंटांच्या पायांना जखमा :29 उंटांचा जथा वणी येथून दिंडोरी हद्दीतील कळवण रोडवर आला. त्यावेळी पोलिसांनी संशयितांकडे उंटाबाबत विचारणा केली. मात्र, संशयितांनी पोलिसांना ठोस उत्तर दिले नाही. तेव्हा पोलिसांनी दिंडोरी पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशूधन विकास अधिकारी डॉ. राहुल कोठाळे यांनी 29 उंटांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात हे उंट तहानलेले अशक्त असल्याचे तसेच त्यांना जास्त चालवल्याने त्यांच्या पायांना जखमा झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे.


राज्यपालांकडून दखल :राजस्थानमधून उंटाची तस्करी होत असल्याची माहिती राजस्थानमधील एका सामाजिक संस्थेने महाराष्ट्राच्या राज्यपालांना कळली. त्यानंतर त्याबाबत दक्षतेचे पत्र राज्यपालांरांकडून पशु कल्याण विभाग,जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले गेले त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाची बैठक घेतली. या बैठकीत नंतर उंट ताब्यात घेतले आहेत. या घडामोडींना थेट राजस्थानमधून वेग आला आहे. हे उंट नेमके कुठे आणि कशासाठी नेण्यात येत होते, याची कसून चौकशी होणार आहे.


उंटांचा रोजचा खर्च 40 हजार रुपये :मागील 11 दिवसांपासून 111 उंटांना निवऱ्यासाठी नाशिकच्या चिंचोळे शिवारातील पांजरपोळा संस्थेच्या परिसरात निवाऱ्यासाठी ठेवण्यात आले आहे. अशात अशक्त वृद्ध अशा आठ उंटांचा मृत्यू झाला. या ठिकाणी रोज या उंटांची खानपान, वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. या उंटांना रोज खाण्यात उसाची कुटी, मूरघात, गूळ शेंगदाणे, हरबरा, वाळले गावत दिले जात होते. रोज या उंटांवर जवळपास 40 ते 45 हजार रुपये खर्च येत असल्याचे नाशिक पंजारपोळा संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांनी सांगितले.

तीन राज्यांचे पोलीस देणारे एस्कॉट :महावीर कॅमल सेंचुरीकडून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान अशा तिन्ही राज्यांच्या पोलीस प्रमुखांसोबत पत्रव्यवहार करून उंटांचा कळप सिरोही पर्यंत पोहोचवण्यासाठी सुरक्षितेकरिता पोलीस एस्कॉर्टची मागणी केली आहे. या तीनही राज्यांकडून पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. उंटांचा पायी प्रवास दीड महिन्यांचा राहणार आहे. यात नाशिक, पेठ, धरमपूर, बार्डीली, कर्जन, बडोदा, अहमदाबाद, मेहताना, पालनपुर, अंबाजीमार्गे सिरोही जिल्ह्यातील कॅमल सेंचुरी पर्यंत प्रवास असणार आहे.

10 लाखांचा खर्च येणार :100 पेक्षा जास्त उंट राजस्थानपर्यंत घेऊन जाणे आव्हानात्मक आहे. या उंटांसोबत असणारे वीस रायका हे त्यांना देवासमान मानतात. या सर्व रायकांना प्रत्येकी 25 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. सुमारे 25 दिवस तरी त्यांना प्रवास करावा लागू शकतो. यासाठी दहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, असे महावीर कॅमल सेंचुरीचे सचिव सुरेंद्र भंडारी यांनी सांगितले.




हेही वाचा -

  1. Serious Allegations Against Thackeray : ठाकरे कुटुंबाकडून वसूल केली जाते खंडणी, भाजपच्या 'या' आमदाराने केला मोठा गौप्यस्फोट
  2. Sanjay Raut visit to Nanded : लोकसभेत जिंकलेल्या 19 जागांवर शिवसेनेचाच उमेदवार असेल -संजय राऊत
  3. Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना 24 मेपर्यंत अटकेपासून संरक्षण

ABOUT THE AUTHOR

...view details