महाराष्ट्र

maharashtra

Uddhav Thackeray Criticizes BJP : महाराष्ट्राची राख, गुजरातमध्ये रांगोळी करायची आहे का?, उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

By

Published : May 4, 2023, 6:38 PM IST

बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे स्थानिकांवर होत असलेल्या अमानुष दडपशाहीवर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. तुम्हाला महाराष्ट्रात राख, गुजरातमध्ये रांगोळी हवी आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Uddhav Thackeray Criticizes BJP
Uddhav Thackeray Criticizes BJP

मुंबई :बारसू प्रकल्पासाठी प्रस्ताव मी मुख्यमंत्री असताना दिल्याचे सांगत आहेत. परंतु, जे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते. ते तुमची सत्ता आल्यावर गुजरातला नेले. तुम्हाला महाराष्ट्राची राख, गुजरातमध्ये रांगोळी करायची आहे का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच बारसू रिफायनरी प्रकल्प चांगला आहे तर लोकांवर जोर जबरदस्ती का? काही उपऱ्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत त्या उपऱ्या लोकांचा वरवंटा आमच्यावर फिरवणार का असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून चढवला.



महाराष्ट्राची नुसती राख करायची का? बारसू रिफायनरीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प राबवण्यासाठी प्रस्ताव दिला होता, असे सांगत सत्ताधाऱ्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि भूमिका स्पष्ट केली. नानार प्रकल्प रद्द झाल्यानंतर माझ्या ध्यानी मनी नसताना मी मुख्यमंत्री झालो. एकनाथ शिंदेंनी यावेळी रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे, यासाठी माझ्याकडे आग्रह धरला होता. परंतु रिफायनरी मुळे होणारे प्रदूषण महाराष्ट्रात मला कदापि मान्य होणार नाही, असे मी स्पष्ट केले होते.

राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले : ज्या ठिकाणी प्रकल्प होऊ शकतो तिकडे हा प्रकल्प घेऊन जावा अशी भूमिका देखील मांडली होती. मात्र आमचे सरकार पाडल्यानंतर मागच्या सहा ते आठ महिन्यात महाराष्ट्रात येणारे चांगले प्रकल्प वेदांता किंवा इतर महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला नेले. परंतु नानारच्या वेळी जी भूमिका मांडली होती त्यावर मी आजही ठाम आहे. आज माझे केवळ पत्र नाचवले जात आहे. परंतु माझ्याच काळात महाराष्ट्रात येणारे प्रकल्प तुम्ही गुजरातला का जाऊ दिले. महाराष्ट्रात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी तुम्हाला करायची आहे का,असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरले आहे.



भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही :बारसू येथील जमिनी काही कोपऱ्याने विकत घेतले आहेत. त्या उपऱ्यांची सुपारी घेऊन तुम्ही माझ्याशी लढायला येत आहात. परंतु माझ्या भूमिपुत्रांवर मी अन्याय होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला सूचक इशारा दिला. आज भूमिपुत्रांच्या घरादारांवर उपऱ्यांचा वरवंटा तुम्ही फिरवणार आहात का? पोलिसांचं बळ का वापरत आहात?लोकांमध्ये जाऊन या प्रकल्पाचे शंका निरसन करायला हवे, लोकांचे गैरसमज दूर करायला हवेत. मात्र लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून तुम्ही संमती घेत आहात. बारसू प्रकल्पात माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. हा प्रकल्प चांगला असेल तिथल्या लोकांनी होकार दिला असेल तर मी तयारी दर्शवली होती. मात्र, आता जसं दिसतंय तसं नाही, लोकांच्या मनात अनेक शंका, प्रश्न आहेत. या सर्वांची उत्तरे मिळायला हवी असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.


मी कोकणात जाणारच : येत्या सहा तारखेला मी कोकण दौऱ्यावर जाणार आहे महिन्याभरापूर्वी हा माझा दौरा जाहीर करण्यात आल्याचे ठाकरे म्हणाले. भाजपचे नेते राणे परिवाराकडून कोकणात पाऊल ठेवून दाखवा या धमकीवर टीका केली. असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. मी माझ्या लोकांना भेटण्यासाठी जातो. त्यामुळे मला अडवण्यापेक्षा लोकांना उत्तर द्या, असे ठाकरेंनी सुनावले.

हेही वाचा - Sharad Pawar : 'लोक माझे सांगाती'मधून उद्धव ठाकरे विरोधात शरद पवारांची उघड भूमिका

ABOUT THE AUTHOR

...view details