मुंबई -रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून रान पेटविण्याकरिता मनसे नेते अमित ठाकरेंच्या नेतृत्वात पदयात्रा सुरू आहे. दरवर्षी गणेशोत्सावाच्या प्रारंभी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर येत असताना मनसेने कोकण जागरयात्रा काढत आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोकण जागर यात्रेनिमित्त अमितसाहेब ठाकरे यांचे पहाटे पाच वाजता वाशी टोल नाका येथे मनसे नवी मुंबईतर्फे जंगी स्वागत करण्यात आलं.
गोवा महामार्गाच्या दूरवस्थेमुळे कोकणातील नागरिक संतप्त भावना व्यक्त करतात. अशा परिस्थितीत सरकारचा निषेध करण्यासाठी आज सकाळी ६ वाजल्यापासून मनसे नेत्यांच्या नेतृत्वात रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील ८ वेगवेगळ्या मार्गांवरून पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी नेत्यांना जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. मार्गावरील पदयात्रा संपल्यानंतर कोकण जागर यात्रेचा समारोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत कोलाड- आंबेवाडी नाका (तालुका- रोहा, जिल्हा- रायगड) येथे होणार आहे. जागरयात्रेत प्रमुख आठ टप्पे असणार आहेत. या प्रत्येक टप्प्यावर मनसेचे नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
असा असणार जागरयात्रेचा टप्पा
- पळस्पे फाटा खारपाडा
- तरणखोप ते कासु
- नागोठणे ते खांब
- इंदापूर ते कोलाड
- पागनाका ते ओमेगा हॉटेल (परशुराम घाट)
- शास्त्रीपूल ते गावमाळा
- निवळी ते वांद्री
- लांजा ते वेरळ
17 वर्षांपासून मुंबई -गोवा महामार्गाचे काम रखडलं- 17वर्षांपासून मुंबई -गोवा महामार्गाचे काम रखडलं आहे. त्याकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष सुरू असल्याचा आरोप बाळा नांदगावकर यांनी केलाय. मुंबई गोवा महामार्ग आणि त्याचे चौपदरीकरण हा अत्यंत कळीचा मुद्दा बनला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू असले तरी हा रस्ता अद्यापही पूर्ण झालेला नाही. कोकणातील मंत्री, खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री यांनी या रस्त्याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही हा रस्ता अद्यापही पूर्ण होऊ शकलेला नाही.
राज ठाकरे होणार सहभागी- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शुक्रवारी मनसेच्या पदयात्रेची माहिती दिली. मनसे नेते नांदगावकर म्हणाले, आपल्याला सर्वांना मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था माहितीच आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार अमित ठाकरे यांचे नेतृत्वाखाली कोकण जागर पदयात्रा काढण्याचं ठरवण्यात आलयं. ही यात्रा पनवेल ते राजापूर अशी असणार आहे. तर, लांजा पासून आमचे नेते अविनाश अभ्यंकर हे यात्रा सुरू करतील. यात्रेत मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि इतर नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष हे सर्व सहभागी होतील. या यात्रेचा समारोप कोलाड येथे होईल. या समारोपाला राज ठाकरे हे देखील यात्रेत सहभागी होणार आहेत.
ही यात्रा सध्या प्रतीकात्मक स्वरूपात-पुढे बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, खरंतर ही पूर्ण यात्रा करण्याचा आमचा मानस होता. पण, रस्त्यावरील खड्डे पाहता स्थानिकांना त्रास होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेवर त्याचा कोणताही परिणाम होऊ नये, प्रशासनावर त्याचा ताण पडू नये यासाठी आम्ही कोलाड येथे शेवट करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही यात्रा आम्ही प्रतिकात्मक म्हणून करत आहोत. आता सरकार देखील थोडेफार जाग झालेले दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी डिसेंबर 2023 पर्यंत या महामार्गाची एक लेन सुरू करण्याचं आश्वासन दिलयं.
आतापर्यंत 15 हजार कोटींहून अधिक खर्च-2008 ते आतापर्यंत या महामार्गाच्या कामासाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयाहून अधिक निधी खर्च करण्यात आला. पुन्हा नवे टेंडर काढणे, नव्याने कोट्यवधी रुपये खर्च करणे हे सर्व चक्र कायम सुरू आहे. आता केंद्रीय मंत्र्यांनी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी काही आश्वासन दिले आहे. त्यानुसार, वेळेत रस्ता पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला केला तर आम्ही त्यांचे जाहीररित्या सत्कार आणि अभिनंदन करू, असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-
- Raj Thackeray News: भाजपासोबत जाणारे गाडीत झोपून जातात- राज ठाकरेंचा अजित पवार यांना टोला
- MNS Toll Plaza Vandalise : टोलनाका राड्यानंतर मनसे-भाजपमध्ये जुंपली; मनसेकडून भाजपला जशाच तसे उत्तर
- Loksabha Election 2024 : वसंत मोरेंची उचलबांगडी? अमित ठाकरेंवर बारामती लोकसभा मतदारसंघाची नवी जबाबदारी?