महाराष्ट्र

maharashtra

'भुजबळ माझ्या नादाला लागू नका'; प्रकाश आंबेडकरांचा ओबीसी नेत्यांना इशारा, मराठा आंदोलकांना दिला 'कानमंत्र'

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 7:36 AM IST

Updated : Nov 26, 2023, 2:55 PM IST

OBC vs Maratha Reservation : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर चांगलीच तोफ डागली (Chhagan Bhujbal Hingoli Sabha) आहे. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादाला लागू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यासह त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनाही कानात सांगणाऱ्यांचं ऐकणं बंद करा, असा सल्ला दिला आहे.

OBC vs Maratha Reservation
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर

मुंबई OBC vs Maratha Reservation : संविधानाच्या सन्मानार्थ वंचित बहुजन आघाडीनं शनिवारी संविधान सन्मान सभेचं दादरच्या शिवाजी पार्क मैदानात आयोजन (Chhagan Bhujbal Hingoli Sabha) केलं होतं. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. या सभेत नाना पटोले यांनी 'वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेससोबत यावं' असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांना केलं. तर, आपल्या भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांना इशारा देत आवाहन केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेते छगन भुजबळांना 'भुजबळ तुम्ही माझ्या नादाला लागू नका. जेव्हा मंडल कमांडल असा वाद सुरू होता, त्यावेळी तुम्ही कुठे होतात? हे सर्वांना माहिती आहे" असं म्हणत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तर, 'मराठा समाजानं देखील संयमानं वागावं' असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात केलं आहे.

आरक्षण नेमकं कशासाठी हे समजून घ्या :वंचित बहुजन आघाडीनं आयोजित केलेल्या संविधान सभेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते दादरच्या शिवाजी पार्क इथं आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या वादावरून भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आरक्षण नेमकं का आहे? आणि कशासाठी आहे? हे अजून देखील आपल्या समाजाला आणि नेत्यांना समजलेलं नाही. आरक्षणाचा इतिहास आधी आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी आरक्षण का दिलं? हे सर्वांनी समजून घ्या. या सभेचा मुख्य उद्देश म्हणजे, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे संविधान" असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.

अखंड भारत म्हणजे काय ? : पुढं बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "सध्या संविधान बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. मागे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताबाबत वक्तव्य केलं होतं. हा अखंड भारत पार अफगाणिस्तानपर्यंत जातो. त्यामुळं जेव्हा तुम्ही अखंड भारत आणि संविधान बदलण्याची भाषा वापरता, तेव्हा हे कोणताच नेता स्पष्ट करत नाही की, अखंड भारत म्हणजे काय? त्यात कोणते देश असतील आणि संविधान बदलणार म्हणजे नेमकं काय करणार? तुम्ही अध्यक्षीय लोकशाही आणणार आहात? सध्या आपल्याकडं संसदीय लोकशाही आहे. की तेच कायम ठेवणार आहात ? कायद्यांमध्ये कोणते बदल करणार आहात का? याबाबत कोणताही नेता बोलत नाही" असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मराठा समाजानं संयमानं वागावं :आरक्षणाबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीचे उदाहरण दिलं. "त्यावेळी सोनिया गांधी यांनी एक इंग्रजी वाक्य म्हटलं आणि त्याचा हिंदी अनुवाद झाला 'मौत का सौदागर' या एका वाक्यामुळे काँग्रेस त्यावेळी जिंकत असलेली निवडणूक हरला होता. माझं मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनादेखील आवाहन आहे. या इतिहासातून तुम्ही काहीतरी शिका. आपल्या स्वीय सहायकानं दिलेलं एक वाक्य वापरल्यानं काँग्रेसला सत्तेपासून लांब राहावं लागलं होतं. त्यामुळं तुम्हीदेखील तुम्हाला जे कानात सांगणारे लोक आहेत, त्यांचं ऐकू नका. ही काही घोडा, गाढव, कुत्रा, मांजरांची शर्यत नाही. ही हाडामासाच्या माणसांची लढाई आहे. त्यामुळं वादग्रस्त वक्तव्य करताना काळजी घ्यावी" असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला केलं आहे.

भुजबळ, तायवाडे ज्यावेळी मंडल-कमंडल असा ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी वाद सुरू होता, त्यावेळी तुम्ही कुठे होतात? याचा तुम्ही स्वतः विचार करा. तेव्हा हे सगळे नेते कमांडल सोबत होते. आम्ही मात्र मंडल आयोगासोबत होतो. तेव्हा कुठं या समाजाला आरक्षण मिळालं आहे. त्यामुळं ओबीसी नेत्यांनी माझ्या नादाला लागू नये-प्रकाश आंबेडकर

ओबीसी नेत्यांनी माझ्या नादाला लागू नये :"दुसरीकडं ओबीसी समाजाचे नेतेदेखील मराठा समाजावर पातळी सोडून टीका करताना दिसत आहेत. मी या आधी देखील सांगितलं होतं, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल, तर ते ओबीसी समाजात विलीनीकरण करून चालणार नाही. त्यासाठी स्वतंत्र ताटच वाढायला हवं. त्यामुळं सध्या जे काही ओबीसी समाजाचे नेते पातळी सोडून बोलत आहेत, त्यांना देखील माझं सांगणं आहे.

हेही वाचा :

  1. भुजबळ ज्या ठिकाणी राहत आहे ते घर फर्नांडिस कुटुंबीयांचं - अंजली दमानियांचा आरोप
  2. 'भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा', मराठा आंदोलकांची मागणी
  3. छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर? मनोज जरांगेंच्या दाव्यानं खळबळ
Last Updated : Nov 26, 2023, 2:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details