महाराष्ट्र

maharashtra

Jalna Maratha Protest : मंत्रालयातून आलेला 'तो' अदृश्य फोन कोणाचा? 'लाठीचार्ज'वरुन संजय राऊतांचा सवाल

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 2:20 PM IST

Jalna Maratha Protest : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या आंदोलकांची खासदार संजय राऊत यांनी शनिवारी भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज (3 सप्टेंबर) सकाळी माध्यमांशी संवाद साधला. मंत्रालयातून अदृश्य फोन आला अन् मराठा मोर्चावर लाठीचार्ज झाला. मंत्रालयातून आलेला तो अदृश्य फोन कोणाचा होता? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला.

Sanjay Raut Criticize On CM
जालना दौऱ्यानंतर संजय राऊत यांचा सवाल

माहिती देताना खासदार संजय राऊत

मुंबई : Jalna Maratha Protest : जालन्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. शनिवारी (2 सप्टेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आंदोलकांची भेट घेतली. जालन्यात मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज ( Jalna LathiCharge) केल्याने परिसरातील आंदोलकांचा संताप उफाळून आला आहे. यावरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut Allegation) यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

मंत्रालयातून एक अदृश्य फोन : शनिवारी आम्ही सर्व जालन्याला गेलो होतो. त्या ठिकाणाची परिस्थिती भयंकर आहे. गावातली लोक त्या ठिकाणी येऊन बसलेले होते. ज्याप्रमाणे अण्णा हजारे आंदोलनाला बसायचे, त्याचप्रमाणे हे मराठा समाजाचे लोकसुद्धा बसले होते. त्यामध्ये सरकारने चिडण्यासारखं काय होतं? 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमांमध्ये या आंदोलनाची झळ पोहोचू नये यासाठी हे आंदोलन चिरडण्यात आलं. आम्ही जेव्हा तेथील आंदोलकांशी बोललो त्यावेळी त्यांनी सर्व हकीकत सांगितली. यातच त्यांनी मंत्रालयातून एक अदृश्य फोन आल्याचे देखील सांगितलं. असे संजय राऊत म्हणाले.

दिल्लीतून फोन आला होता? : या ठिकाणी अदृश्य फोन हा कोणाचा आला होता? हे सरकारनं सांगावं. हा फोन नक्की कोणाचा होता म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री की, दिल्लीतून आला होता? याचा खुलासा या सरकारनं केला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. तसेच सरकार फ्रस्टेड झालं आहे. एका बाजूला चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला लाठीचार्ज करायचा हा प्रकार योग्य नाही. ज्यावेळी लाठीचार्ज झाला तेव्हा मुंबईमध्ये 'इंडिया' आघाडीची बैठक पार पडली. आमची पत्रकार परिषद त्याचवेळी सुरू होती. 'इंडिया'आघाडीवरचं लक्ष विचलित करण्यासाठी त्या ठिकाणी असा अमानूष प्रकार या सरकारनं घडवून आणला, असे राऊत म्हणाले.

'इंडिया' आघाडीच्या बैठकीला गालबोट : उद्धव ठाकरे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील मराठा समाजाचं आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन झालं होतं. परंतु, तेव्हा मराठा आंदोलकांनी संयम सोडला नाही. महाविकास आघाडीच्या सरकारनं कधीही लाठीचार्ज केला नाही. 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला गालबोट लावण्यासाठी हे कारस्थान करण्यात आले, असा आरोप संजय राऊत यांनी लावला आहे. मुख्यमंत्री झोपलेले आहेत. त्यांना हे आंदोलन आणखी चिघळवायचे आहे. त्या गावात पोलीस जाऊ शकत नाहीत हे गृह खात्याचं अपयश आहे. उपोषण करणारे मनोज यांना त्या ठिकाणी ओढत नेलं. असा प्रकार योग्य नाही. त्यांना विनंती करून सांगायला पाहिजे होते, असेही राऊत यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

Lathicharge in Jalna : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

Sanjay Gaikwad On Raut : एकनाथ शिंदेंना लाचार म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी आरशात तोंड बघावं- आमदार संजय गायकवाड

Sanjay Raut On Eknath Shinde : अत्यंत लाचार मुख्यमंत्री सत्तेवर बसवला; नीती आयोगाच्या बैठकीतील ठरावावरुन संजय राऊत यांचा संताप

ABOUT THE AUTHOR

...view details