मुंबई:शिवसेना नेते संजय राऊत(Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या बहु प्रतिक्षित पत्रकार परिषदेत आज त्यांनी स्पष्ट केले की,आज मुंबईत धाडीवर धाडी सुरु आहेत. मग आम्ही सुद्धा विचार केला की, आपण पण धाड टाकावी, सध्या आयटी ईडीची भानामती सुरु आहे. शिवसनेनेला, महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) त्रास देण्यासाठी या धाडी सुरु आहेत. महापालिका निवडणुका होई पर्यंत या धाडी सुरुच राहणार आहेत. इनकम टॅक्स आणि ईडीला आतापर्यंत मी 50 भ्रष्टाचाऱ्यांची नावे दिली आहेत ते त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. आता आम्ही केंद्रिय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्या शिवाय राहणार नाहीच. केंद्रिय मंत्र्यांविरोधात किरीट सोमैय्यांनीच पुरावे दिलेले आहेत. मग केंद्रीय यंत्रणा त्या मंत्र्यांच्या घरावर धाडी का टाकत नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
एका दूधवाल्याकडे 8 हजार कोटींची संपत्ती कुठून आली, 2-4 वर्षात एखाद्याचे उत्पन्न करोडोने कसे वाढते मलबार हिल सारख्या भागात त्याची हवेली उभी राहते. हे ईडी आणि आयकर विभागाला दिसत नाही का? त्यांनी आपला चष्मा बदलायला पाहिजे. सोमैय्या हे ईडीचे वसुली एजंट आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांना भाजपकडून तिकिट दिले जाते असा आरोपही त्यांनी केला आहे.
आम्ही ईडी आयटीची भानामती उघडकीस आणनारच, तुम्ही माझ्यावर रेड टाकू शकता मला अटक करु शकता. हे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, ईडी आणि ईडीचे काही अधिकारी भाजपची एटीएम मशिन बनली आहेत मी पंतप्रधानांना सविस्तर पुरावेही दिले आहेत. स्वच्छ भारत अभियानात केवळ कचराच नव्हे तर भ्रष्टाचारही साफ करा हे माझे पंतप्रधानांना सांगणे आहे. राजकीय विरोधकांसोबत इडी काय करतेय याचा पाढाच त्यांनी वाचला. मी सध्या 1 पार्ट दिला आहे असे 10 पार्ट देणार असेही त्यांनी सांगितले.