महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Coastal Road Project: 'या' कारणामुळे चुकली कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याच्या पूर्णत्वाची डेडलाईन; एप्रिल महिन्यात होईल पूर्ण

By

Published : Mar 19, 2023, 8:56 AM IST

मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून कोस्टल रोडची ओळख आहे. कोस्टल रोडमुळे मुंबईमधील ट्रॅफिकची समस्या कमी होणार आहे. कोस्टल रोडच्या कामासाठी दोन बोगदे बांधले जात आहेत. त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या बोगद्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. हे काम १५ मार्चला पूर्ण होईल अशी घोषणा पालिका आयुक्तांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर केली होती. मात्र तांत्रिक अडचणी आल्याने ही डेडलाईन चुकली आहे. आता हे काम एप्रिल महिन्यात पूर्ण होणार आहे.

Mumbai Coastal Road Project
कोस्टल रोड

मुंबई :मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शहरातून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी दोन ते तीन तासाचा कालावधी लागतो. यासाठी सागरी किनार सेतू मार्ग म्हणजेच कोस्टल रोड बांधला जात आहे. १०.५८ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूला २ किलोमीटरचे दोन बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी एक बोगदा १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाला आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम १५ मार्च पर्यंत पूर्ण होईल असे पालिका आयुक्तांनी घोषित केले होते. मात्र बोगदा खणत असलेल्या मावळा या टीबीएम मशीनच्या मेंटेनंसमुळे कामाला उशीर लागत आहे. आजही १६० मीटर बोगदा खोदण्याचे काम बाकी आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, अशी शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.


रस्त्याचे ७२ टक्के काम पूर्ण :मुंबई शहारातील प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी लिंक या दरम्यान १०.५८ किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड बांधण्याचे काम सुरु आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये याचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. आतापर्यंत ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर तीन हात असणार आहेत. त्यामधील दोन हातांचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. तर कोस्टल रोडच्या पिलर क्रमांक ७ आणि ९ मधील अंतर १२० मीटर ठेवण्याचा निर्णय झाला आहे. वरळी कोळीवाडा येथील दोन पिलारमधील अंतर वाढवल्याने येथील हाताचे काम पूर्ण व्हायला उशीर होणार आहे. ते काम २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे.


मच्छीमारांना नुकसान भरपाई :कोस्टल रोड प्रकल्प उभारताना मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम झाला. रोजगार बुडत असल्याने १ हजार मच्छीमारांनी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मुंबई महापालिकेकडे केली होती. पालिकेने नुकसानीची चाचपणी करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची नियुक्ती केली. या संस्थेने प्रकल्प सुरू झाल्यापासून ते प्रकल्प पूर्ण होण्याच्या कालावधीतील नुकसान भरपाई द्यावी, असा अहवाल देण्यात आला. बोटीतून हाताने जाळे टाकून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नियमितपणे बोटी सुरू झाल्यानंतर ही भरपाई देणे बंद केले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.



यांना होणार फायदा :कोस्टल रोड प्रकल्पामुळे ३४ टक्के इंधनाची बचत होणार आहे. ७० टक्के वेळेची बचत होणार आहे. या प्रकल्पामुळे ७० हेक्टर हरीत क्षेत्र उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्याने मुंबई शहरातून पश्चिम उपनगरात जाणाऱ्या लोकांना सध्या दोन ते तीन तासाचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी होणार आहे. ४५ मिनिटात शहरातून नागरिक पश्चिम उपनगरात पोहचू शकणार आहेत. तांत्रिक अडचणींमुळे कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याच्या पूर्णत्वाची डेडलाईन चुकली आहे.

हेही वाचा : Dosti Mhada Scam : म्हाडाच्या शेकडो फ्लॅट्समध्ये मोठा घोटाळा; 150 हून अधिक फ्लॅट हडपल्याचा नागरिकांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details

संबंधित बातम्या