गडचिरोली- गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात यावर्षी पाचव्यांदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक मार्ग बंद असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन तासांपासून गडचिरोली शहरातही अती मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर येथील नगरपरिषदही पाण्याखाली गेली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी; पुरामुळे अनेक मार्ग बंद
३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरला असून ३१ ऑगस्टपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकट्या भामरागड तालुक्यात २४४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
![गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी; पुरामुळे अनेक मार्ग बंद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4337619-thumbnail-3x2-gy.jpg)
३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरला असून ३१ ऑगस्ट पासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकट्या भामरागड तालुक्यात २४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, या तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याने अल्लापल्ली-भामरागड, आष्टी-आलापल्ली, गडचिरोली-चामोर्शी, गड अहेरी-अहेरी, मुलचेरा हे मार्ग बंद झाले आहेत.
भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला कालच पूर आल्याने भामरागड तालुक्यातील १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीने धोक्याची पातळ गाठली आहे. त्यामुळे आष्टी-चंद्रपूर हा राष्ट्रीय मार्गही बंद होण्याच्या स्थितीत आहे. मुसळधार पाऊस आताही सुरू असल्याने मोठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.