अहमदनगर- शहरी भागात कोरोना विषाणूचा संसर्गामुळे अनेकांना बाधा झाली, तर काहींचे प्राण गेले आहेत. तरीही शहरी नागरिक सरकार, आरोग्य विभाग सांगत असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करत नाही. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील चित्र अगदी वेगळे आहे. सुदैवाने ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग विरळाच असला, तरी गाव-खेड्यातील, वाड्या-वस्त्यावरील ग्रामस्थ कोरोनाच्या संसर्गामुळे सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सींग ) ठेवत नियमित व्यवहार करत आहेत.
कोरोना इफेक्ट; गड्या आपला गाव बरा, ग्रामीण भागात पाळले जाते 'सोशल डिस्टन्सींग'
कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशभर धुमाकूळ घातला असला, तरी गावाकडे अद्यापही कोरोनाचा फारसा शिरकाव झाला नाही. गावातील नागरिक सुरक्षित अंतर राखत दैनंदिन व्यवहार करत आहेत.
![कोरोना इफेक्ट; गड्या आपला गाव बरा, ग्रामीण भागात पाळले जाते 'सोशल डिस्टन्सींग' devva](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6799599-200-6799599-1586936134823.jpg)
तरुणवर्ग एकीकडे शेतीवरील कामे करत असताना ज्येष्ठ आणि वयोवृद्ध मंडळी गावच्या पाराखाली सध्या एकत्र न येता एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवत गप्पागोष्टी, पेपर वाचन करताना दिसून येत आहेत.
आदर्शग्राम हिवरे बाजारमध्ये याचे प्रातिनिधिक चित्र पाहण्यास मिळाले. ग्रामपंचायतीत कामाच्या निमित्ताने आल्यानंतर कोरोनाविषयी आवश्यक माहिती वृत्तपत्र वाचनातून नागरिक घेतात. एकमेकात सोशल डिस्टन्सींग बाळगताना या मंडळीकडे पाहिले, की शहरातील नागरिकांनी नक्कीच यातून आदर्श घेणे गरजेचे आहे, असे वाटून जाते..