नवी दिल्ली : बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. इंदूर कसोटीत दणदणीत विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघ उत्साही असून पुन्हा एकदा चांगला खेळ दाखवून भारताला चकित करू शकतो. टीम इंडियासाठी हा कसोटी सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. भारताने हा सामना जिंकल्यास मालिका जिंकण्यासोबतच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे तिकीटही मिळेल. इंदूरमधील पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग-11मध्ये बदल होऊ शकतो. श्रीकर भरतच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
श्रीकर भरतची निराशाजनक कामगिरी :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत झालेल्या तीनही कसोटी सामन्यांमध्ये श्रीकर भरतचा यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. मात्र भरतच्या फलंदाजीत फारशी कामगिरी पहायला मिळाली नाही. फलंदाजीतील त्याची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाल्याचे पहायला मिळाले. रस्ता अपघातात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे टीम इंडियाचा नियमित यष्टिरक्षक रिषभ पंत सध्या संघाच्या बाहेर आहे. तो संघाचा भाग होऊ शकला नाही. त्याच्या अनुपस्थिती सध्या संघाला खूप जाणवत आहे. इशान किशनचाही संघात समावेश आहे, त्यामुळे अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटीत यष्टिरक्षक फलंदाज म्हणून किशनला प्लेइंग-11 मध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे.