नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील नेत्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 12 जुलैपासून जोरदार प्रचार सुरू करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाला मोठा वाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात काँग्रेसला पुन्हा बळ मिळण्याची संधी : यासंदर्भात कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की, राज्यात काँग्रेसला पुन्हा बळ मिळण्याची मोठी संधी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी राज्यातील नेत्यांना बुधवारपासूनच प्रचाराला गती देण्यास सांगितले आहे. राहुल गांधी आणि पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. तसेच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या प्रचाराबाबत चर्चा केली.
कॉंग्रेसचे नेते गावागावांना भेटी देणार : पाटील यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी पक्षाच्या व्यवस्थापकांना महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांकडे देण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील गावांना भेटी द्याव्यात, अशी राहुल गांधींची इच्छा आहे. गेल्यावर्षीच्या त्यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा सर्वोत्कृष्ट होता असे राहुल गांधींनी म्हटले आहे. त्यांनी राज्याच्या वरिष्ठ नेत्यांना सप्टेंबरमध्ये प्रत्येक जिल्ह्यात मोठी पदयात्रा काढण्यास सांगितले. तसेच नोव्हेंबरमध्ये त्यांनी संयुक्त मोर्चा काढण्यास सांगितले असून त्यात सर्व ज्येष्ठ नेते सहभागी होतील.