महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Congress Dispute : महाराष्ट्र कॉंग्रेसमधील वादामुळे मल्लिकार्जुन खरगे संतप्त, रमेश चेन्निथला यांच्यावर सोपविली मोठी जबाबदारी

By

Published : Feb 17, 2023, 7:41 AM IST

काँग्रेसच्या महाराष्ट्र युनिटमध्ये सर्व काही सुरळीत चाललेले नाही. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील मतभेदांमुळे संतप्त झालेल्या पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांच्याकडे प्रकरणाचा तपास सोपवत अहवाल मागितला आहे.

Mallikarjun Kharge
मल्लिकार्जुन खरगे

नवी दिल्ली : महाराष्ट्र युनिटमधील भांडणामुळे संतप्त झालेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांना राज्यातील समस्यांवर त्वरित अहवाल सादर करण्यासाठी विशेष दूत म्हणून नियुक्त केले. कॉंग्रेसचे संघटना प्रभारी केसी वेणुगोपाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, एमएलसी निवडणुकीवरून महाराष्ट्र युनिटचे प्रमुख नाना पटोले आणि जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात झालेल्या मतभेदांमुळे खरगे नाराज आहेत.

सत्यजित तांबे यांच्यावरून वाद : 12 जानेवारी रोजी खरगे यांनी डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून एमएलसी निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले. मात्र, डॉ. तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने खरगे यांना मोठा धक्का बसला. 15 जानेवारी रोजी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने डॉ. सुधीर तांबे यांनी एमएलसी निवडणुकीसाठी अर्ज न भरल्याने त्यांना निलंबित केले आणि चौकशी सुरू केली. युवक काँग्रेसचे माजी नेते सत्यजित यांना पक्षाने बंडखोर घोषित केले, कारण त्यांच्यावर भाजपची मदत घेतल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे डॉ. तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय आहेत.

थोरातांनी राजीनामा दिला : महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करण्यास असमर्थता दर्शवत थोरात यांनी 7 फेब्रुवारीला पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर या दिग्गज नेत्याचे मनधरणीचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. तत्पूर्वी, थोरात यांना जूनमध्ये राज्यसभा आणि एमएलसी निवडणुकीदरम्यान पक्षाच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याबद्दल पक्षाकडून प्रश्नांचा सामना करावा लागला होता. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही या घटनेमुळे संतप्त झाल्या होत्या आणि त्यांनी स्पष्टीकरण मागण्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य विधानसभेत काँग्रेसच्या ४४ पैकी ७ आमदारांनी क्रॉस व्होट केले होते, ज्यामुळे पक्षाचे उमेदवार प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. मात्र, काँग्रेसचे अन्य उमेदवार मुंबई विभागप्रमुख भाई जगताप विजयी झाले होते.

काँग्रेसला राज्यात फटका बसतोय : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात थेट एमएलसी निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. त्यानंतर सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी पाठवले. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, अहवाल सादर केला गेला, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. राज्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत असताना हा काँग्रेसला बसलेला मोठा धक्का आहे.

बीएमसी निवडणूक स्वबळावर : शिवसेनेतील सत्ता संघर्ष आणि महाविकास आघाडीचे अनिश्चित भवितव्य यामुळे गेल्या वर्षी जुलैमध्ये काँग्रेसने बीएमसी निवडणुकीत एकट्याने उतरण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीचे माजी नेते नाना पटोले कॉंग्रेस बीएमसी निवडणूक एकटाच लढवणार असल्याचे सांगून मित्रपक्षांना डिवचण्याचे काम करत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीएमसी प्रभागांच्या पुनर्रचनेमुळे प्रदेश काँग्रेसचे नेतेही नाराज झाले होते. त्यांनी या विषयाला विरोध केला होता. 28 डिसेंबर 2022 रोजी, काँग्रेसच्या स्थापना दिनी, खरगे यांनी मुंबईत एका सभेला संबोधित केले, जिथे त्यांनी कार्यकर्त्यांना राज्यात पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले होते.

अशोक चव्हाणांकडून आघाडीचे समर्थन : माजी राज्य युनिट प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, 'महाराष्ट्र काँग्रेस एकजूट आहे. परस्पर मतभेदासारखा मोठा मुद्दा नाही. नेत्यांमध्ये काही किरकोळ मुद्दे आहेत जे चर्चेतून सोडवले जातील. त्यांच्या म्हणण्यानुसार सत्यजित तांबे अपक्ष म्हणून निवडून येणे हा चिंतेचा विषय होता, परंतु कॉंग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील या प्रकरणाची चौकशी करत असल्याने यावर अधिक बोलणार नसल्याचे ते म्हणाले. अशोक चव्हाण यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे समर्थन केले आणि म्हणाले की, ही एक आदर्श परिस्थिती असेल. परंतु युतीच्या भागीदारांकडूनही समजूतदारीची अपेक्षा आहे. ते म्हणाले, 'योग्य समन्वय असेल तर युती आदर्श ठरेल आणि पुढील लोकसभा निवडणुकीतही काम करू शकेल.' तसेच एकेकाळी काँग्रेसची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात काँग्रेस मजबूत करण्याचे एच.के.पाटील यांचे ध्येय साकार करण्यासाठी राज्याची संपूर्ण टीम काम करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा :Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासात प्रथमच होणार महाआरती; शिवनेरीवर राज्य सरकारचा उपक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details