महाराष्ट्र

maharashtra

G20 Summit : जी २० परिषदेचा काय आहे अजेंडा? जाणून घ्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 10:45 AM IST

G20 Summit
जी २० शिखर परिषद

G20 Summit : नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावरील 'भारत मंडपम' येथं जी २० नेत्यांच्या शिखर परिषदेचं आयोजन होत आहे. जाणून घ्या या परिषदेचा आजचा कार्यक्रम आणि अजेंडा.

नवी दिल्ली G20 Summit : नवी दिल्लीत शनिवारी १८ व्या जी २० शिखर परिषदेचं आयोजन होत आहे. या परिषदेसाठी ३० हून अधिक राष्ट्रप्रमुख, १४ आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख आणि युरोपियन युनियनचे उच्च अधिकारी उपस्थित आहेत. या परिषदेचा अजेंडा काय असणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'वसुधैव कुटुंबकम्' परिषदेची थीम : जी २० नेत्यांच्या शिखर परिषदेदरम्यान 'वन अर्थ' हा चर्चेचा मुख्य विषय असेल. त्यावर आधारित 'वन अर्थ' हे पहिलं सत्र होईल. या वर्षीच्या जी २० शिखर परिषदेची थीम 'वसुधैव कुटुंबकम्' किंवा 'एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य' अशी आहे. ही उपनिषदाच्या प्राचीन संस्कृत ग्रंथातून घेतली आहे. ही थीम मानव, प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांच्यातील परस्परसंबंधांची पुष्टी करते. 'वन अर्थ' सत्राच्या समारोपानंतर दुपारी ३.०० वाजता 'एक कुटुंब'चं दुसरं सत्र आयोजित केलं जाईल.

संध्याकाळी ७ वाजता डिनरचं आयोजन : संध्याकाळी सुमारे ७ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या डिनरचा कार्यक्रम होईल. या डिनरला विविध देशांचे प्रमुख, मोदी सरकारच्या सध्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री तसेच देशातील काही माजी ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे या डिनरला उपस्थित राहणार आहेत. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे या शिखर परिषदेत सहभागी झालेले नाहीत.

भारताची उद्दिष्ट काय आहेत : या शिखर परिषदेत चीनचं प्रतिनिधित्व पंतप्रधान ली कियांग करतील. तर परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह हे रशियाचं प्रतिनिधित्व करतील. भारत पहिल्यांदाच जी २० शिखर परिषदेचं आयोजन करत आहे. या दरम्यान भारत आपली प्राचीन परंपरा आणि सामर्थ्य जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आफ्रिकन युनियनला जी २० चं सदस्य मिळवून देणं आणि शिखर परिषदेत युक्रेनमधील युद्धाशी संबंधित संयुक्त निवेदनाबाबतचे मतभेद दूर करणं, ही भारताची उद्दिष्ट आहेत.

भारताचं या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित : जी २० च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारतानं सर्वसमावेशक वाढ, डिजिटल नवकल्पना, हवामानातील लवचिकता यासारख्या विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे. जी २० गटात नायजेरिया, अर्जेंटिना, इटली, एयू (कॉमरोस द्वारे प्रतिनिधित्व), दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, युनायटेड किंगडम, जपान, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, चीन, यूएई, ब्राझील, इंडोनेशिया, तुर्की, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, मॉरिशस, युरोपियन युनियन आणि सिंगापूर यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. Rishi Sunak India Visit : भारतात पोहोचताच 'देसी' स्टाईलमध्ये दिसले ऋषी सुनक
  2. G20 Summit : जी २० दरम्यान सायबर हल्ल्याची भिती, जाणून घ्या काय आहे भारताचा फुलप्रूफ प्लॅन
  3. G20 Summit : आंतरराष्ट्रीय स्तरावर पैठणीची मागणी वाढणार!; दिल्लीत जी २० परिषदेत होणार पैठणीची ब्रँडिंग

ABOUT THE AUTHOR

...view details