कबुतरखाना वाद प्रकरण : महापालिकेनं कबुतरखान्यासाठी जागा द्यावी, जैन समाजाची आयुक्तांकडं धाव
दादरमधील कबुरखान्याचा वाद सुरू असल्यानं न्यायालयाच्या आदेशानुसार काही कबुतरखाने बंद करण्यात आले. मात्र कबुरतखान्यासाठी महापालिकेनं पर्यायी जागा द्यावी अशी मागणी जैन समाजानं केली आहे.


Published : October 29, 2025 at 11:06 AM IST
मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुंबईतील कबुतरखान्यांचा वाद अद्याप मिटलेला नाही. जैन समुदायाकडून मुंबईतील कबुतरखाने सुरू करण्यासाठी सातत्यानं महापालिका आयुक्तांची भेट घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एका नव्या कबूतरखान्याचं उद्घाटन केलं. त्यानंतर आता मुंबईतील कबुतरखान्यांसाठी मुंबईकरांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेवून बृहन्मुंबई महानगरपालिकेनं त्या उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचेकडं केली. अशा पर्यायी जागांचा शोध घेवून त्याबाबतची माहिती न्यायालयाकडं सादर करण्यात येईल, असं आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी या शिष्टमंडळाला सांगितलं.

न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरखाने बंद : मुंबई महानगरात ठिकठिकाणी असणारे कबुतरखाने न्यायालयाच्या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे बंद करण्यात आले आहेत. सोबतच कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीनं आणि ठराविक वेळेतच कबुतरांना खाद्यं पुरवावं तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत न्यायालयाच्या आदेशान्वये हरकती आणि सूचना मागवण्याची कार्यवाही देखील महानगरपालिका प्रशासनानं केली असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
नागरिकांनाही कबुतरखान्यांचा त्रास होणार नाही : मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये अशा जागांचा शोध घ्यावा की, जिथे कबुतरांना दाणे पुरवता येतील आणि नागरिकांनाही कबुतरखान्यांचा त्रास होणार नाही, अशी प्रमुख मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळानं आयुक्त गगराणी यांच्याकडं केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं अशा पर्यायी जागांचा शोध घेण्यात येईल. तसेच, सदर कबुतरखान्यांची बाब न्यायप्रविष्ट असल्यानं अशा पर्यायी जागांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असं गगराणी यांनी यावेळी जैन समाजाच्या शिष्टमंडळासमोर स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा :

