ETV Bharat / state

पंधरा दिवसात पंतप्रधान फक्त एक तास संसदेत आले, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 10:54 PM IST

Updated : Feb 17, 2024, 11:40 AM IST

Sharad Pawar : जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांनी एक दिवससुद्धा पार्लमेंट चुकवली नव्हती. परंतु, पंधरा दिवसांच्या अधिवेशन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त एक तासासाठी पार्लमेंटमध्ये आल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

भाषणात बोलताना शरद पवार

सातारा Sharad Pawar : संसदेचं पंधरा दिवसांचं सेशन झालं. त्यामध्ये प्रधानमंत्री एक तासासाठी पार्लमेंटमध्ये आले. त्यांनी पुन्हा डोकावून सुद्धा बघितलं नाही, अशा शब्दांत खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांनी एक दिवससुद्धा संसद चुकवली नव्हती, याचाही दाखला त्यांनी दिला.

संसद लोकशाहीचं मंदिर : साताऱ्यातील कृषी प्रदर्शनात बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, "पार्लमेंट ही लोकशाहीमधील महत्वाची संस्था आहे. तिचा सन्मान केला पाहिजे, तिथं प्रश्न मांडायची संधी ही सगळ्यांना असली पाहिजे. पण, आज आम्ही बघतो 15 दिवसांचं सेशन झालं. त्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक तासासाठी पार्लमेंटमध्ये आले. बाकी डोकावूनसुद्धा बघितलं नाही. जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, यशवंतराव चव्हाण असोत, त्यांनी एक दिवससुद्धा चुकवला नाही. संसद हीलोकशाहीचं मंदिर आहे. त्याचा सन्मान केला पाहिजे."

आपली वैचारिक भूमिका मजबूत : शरद पवार म्हणाले, "माझं एकच सांगणं आहे की, कोणी गेलं किंवा कोणी आणखी काही केलं, तरी आपण विचार सोडायचा नाही. आपल्यात धमक आहे. कष्ट करण्याची तयारी आहे. वैचारिक भूमिका मजबूत असली, तर कोणी काहीही करू शकत नाही. त्यामुळं वेगळी भूमिका घेणाऱ्यांना लोकशाहीमध्ये आपण त्यांची जागा दाखवू शकतो," असा विश्वास त्यांनी आपल्या समर्थकांना दिला.

काही लोकांनी पक्ष आणि चिन्ह नेलं. पण, मी त्याची कधी चिंता करत नाही. विकासासाठी वेगळ्या मार्गानं जाण्याची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण, ती भूमिका सामान्य जनतेला पटणारी नाही. सत्ता येते आणि जाते. मात्र, विचार, धोरणं ही कायमची असतात. देशाला पुढे नेण्यासंबंधीचा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे-माजी केंद्रीय मंत्री शरद पवार

अटलबिहारी वाजपेयींचं दिलं उदाहरण : "या देशात अटल बिहारी वाजपेयी भाजपाचे नेते अनेक वर्ष विरोधी पक्षात होते. त्यांनीही देशाची सेवा केली. देशाच्या सेवेसाठी स्वतःचा विचार, पक्ष सोडून दुसरीकडं जाण्याची भावना कधी त्यांच्या मनात आली का? त्यांनी कधी विचार सोडला नाही. वैचारिकदृष्ट्या आमचे मतभेद असतनाही विचार त्यांनी जतन केला. ही गोष्ट मान्य केली पाहिजे, असं उदाहरण देत शरद पवारांनी अजितदादांना टोला लगावला.

महाराष्ट्रात नवीन पिढीचे नेतृत्व तयार करू : "अनेक लोक म्हणतात की वय झालं. म्हणून काय झालं? असा खोचक सवाल करून शरद पवार म्हणाले, वयाची चिंता करू नका. याही परिस्थितीत आपण मात करू शकतो. वयाच्या 85 व्या वर्षी मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान झाले. मनःस्थिती आणि विचारधारा जर भक्कम असली, तर वय कधी आडवं येत नाही. आपण आपल्या भूमिका घेऊन पुढे जाऊया. आपण नवीन पिढीचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये तयार करू. नवी पिढी महाराष्ट्र घडवू शकते, हा इतिहास निर्माण करू."

हे वाचलंत का :

  1. मराठा समाजाची फसवणूक केल्यानं मुख्यमंत्र्यांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करणार - संजय लाखे पाटील
  2. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची मागणी घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका
  3. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात; पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शाहांच्या अभिनंदनाचे ठराव पारित
Last Updated :Feb 17, 2024, 11:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.