ETV Bharat / state

राज ठाकरेंनी उष्णतेच्या लाटेवरुन हवामान विभागाला झापलं; काय म्हणाले नेमकं? - Raj Thackeray on Weather Department

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 5:29 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कधी आणि कोणाला धारेवर धरतील याचा अंदाज येत नाही. शिक्षक, डॉक्टर यांना निवडणुकीच्या कामाला लावल्यामुळं राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला झापलं होतं. आता राज ठाकरे यांनी थेट भारतीय हवामान विभागालाच धारेवर धरलंय. काय आहे नेमकं प्रकरण वाचा....

मुंबई Raj Thackeray : भारतीय हवामान विभागानं (Weather Department) उष्णतेची लाट (Heat Wave in Maharashtra) येण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह कोकणात पारा वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत पुन्हा तापमानात वाढ होणार आहे. पुढच्या चार दिवसांच्या कालावधीत मराठवाड्याच्या कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तापमान निर्देशांक 40 ते 50 अंशांच्या दरम्यान असू शकतो, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली.

राज ठाकरेंचा हवामान विभागाला सवाल : जवळपास सर्वच नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या हवामान बदलाची नोंद घेतली. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी 'उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं आधीच का नोंदवली नाही?' असा प्रश्न उपस्थित केला. आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, "गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशांपर्यंत गेलंय. अर्थात उर्वरित महाराष्ट्रातपण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो."

शाळांना सुट्टी जाहीर करा : राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, "अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू व्हायला अजून काही काळ असल्यामुळं त्यांना शाळेत जावं लागत आहे. याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारनं शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल."

कार्यकर्त्यांना विनंती : राज ठाकरे आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पुढं लिहितात की, "माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की, तुम्हीपण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात ते प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल याची तजवीज करा, प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीनं गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा."

मुंबईचा पारा 40 पार : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं मुंबईसह कोकण विभागाला पुढील दोन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. सोमवारी सायंकाळपर्यंत नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील पारा 40 पार गेल्याची नोंद करण्यात आली. हवामान विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, कर्जत 43.7 अंश सेल्सिअस, मुरबाड 43.2 अंश सेल्सिअस, बदलापूर 42.5 अंश सेल्सिअस, कल्याण 42.4 अंश सेल्सिअस, ठाणे 41.6 अंश सेल्सिअस, नवी मुंबई 41.5 अंश सेल्सिअस, विरार 39.1 अंश सेल्सिअस, मुंबई 37. 9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. मुंबई आणि शेजारील जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झाल्यानं मुंबईत उष्णतेची लाट आल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा -

  1. 'मोदींमुळंच राम मंदिर झालं', राज ठाकरेंची पंतप्रधानांवर स्तुतीसुमनं; उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच संपवली पत्रकार परिषद - Raj Thackeray
  2. मनसेच्या एन्ट्रीमुळं नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराला फायदा होणार? काय म्हणाले राजकीय तज्ज्ञ? - lok sabha election 2024
  3. एका व्यक्तीच्या हातात देश देणं धोकादायक, देशात संमिश्र सरकार हवं - उद्धव ठाकरे - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.