ETV Bharat / state

Saroj Patil PC : पवार कुटुंब अभेद्य, शरद आणि अजित पवार एकत्र येतील; शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांना विश्वास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 5:26 PM IST

Saroj Patil PC
सरोज पाटील

Saroj Patil PC : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार एकत्र येतील असा विश्वास शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्या आज (20 मार्च) रोजी पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

सरोज पाटील पवार कुटुंबीयांच्या एकत्रिकरणाविषयी बोलताना

कोल्हापूर Saroj Patil PC : राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपाच्या सत्तेसोबत गेले तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी नव्या पक्ष आणि चिन्हासह लोकसभेसाठी पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारांनीही शरद पवारांची साथ देत आपला पाठिंबा दर्शवला. तर शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी पवार कुटुंब अभेद्य असून भविष्यकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार एकत्र येतील असा विश्वास व्यक्त केला. कावळ्याच्या शापानं गुरं मरत नसतात, असा टोलाही त्यांंनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. कोल्हापुरात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

शरद पवारांमागे महाराष्ट्र उभा राहील : बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या भावजय सुनेत्रा पवार अशी हाय व्होल्टेज लढत राज्याला पाहायला मिळणार आहे. आमदार रोहित पवार, श्रीनिवास पवार हे कुटुंबातील सदस्य थोरल्या पवारांसोबत खांद्याला खांदा लावून भाजपा विरोधात लढत आहेत. दुसरीकडे पक्षफुटीनंतर दुरावलेले राष्ट्रवादीचे अनेक शिलेदार शरद पवारांकडे परतत आहेत. यामुळे जनसामान्यात शरद पवारांची प्रतिमा अजूनही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी त्यांची पाठराखण करत आमच्या कुटुंबात कोणतेही मतभेद नाहीत, राज्याच्या राजकारणाची जाण असलेल्या शरद पवारांमागे महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाची पुन्हा सत्ता नको असेल तर जनतेनं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं, असं आवाहन देखील त्यांनी केलं.

मंत्री चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करायचं आहे असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा समाचार घेत पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी भाजपाला लक्ष्य केलं. खोटेनाटे आरोप करून देवाला साकडं घालून, राम मंदिराला जाऊन शरद पवारांचा पराभव करणे शक्य नाही. पवारांचे काम लोक जाणतात. त्यामुळे कावळ्याच्या शापानं गुरं मरत नाही, असा टोलाही लगावला आहे.

श्रीमंत शाहू महाराजांसाठी अंनिस मैदानात : राज्यातल्या महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा जागेसाठी श्रीमंत शाहू महाराजांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोक सुज्ञ आहेत. त्यांना कोणाला निवडून द्यायचं ते सांगावं लागत नाही. कोल्हापूरचे लोक शाहू महाराजांना निवडून देतील. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही आम्ही सूचना दिल्या असल्याचं सरोज पाटील म्हणाल्या.

हेही वाचा :

  1. Kavita Petition in Supreme Court: 'माझी अटक बेकायदेशीर'; कविता यांची ईडी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
  2. Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं जारी केली अधिसूचना ; जाणून घ्या महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेच्या तारखा
  3. Vijay Shivtare: शिवतारेंमुळं महायुतीत मिठाचा खडा? ...तर आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, अजित दादांच्या कार्यकर्त्यांचा इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.