ETV Bharat / state

पालघरमध्ये मतदानादिवशी मतदारांचे हाल; लाखो लोकांची नावं मतदार यादीतून गायब, राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप - Palghar Lok Sabha

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 9:46 AM IST

Lok Sabha Election 2024 : पालघर लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर आलाय. मतदानाच्या दिवशीच, मतदान कार्ड सोबत असूनही अनेकांना यादीत नाव नसल्यानं मतदान करता आलं नाही.

Lok Sabha Election 2024 Palghar Constituency more than one lakh names are missing in election commission list
पालघर लोकसभा मतदारसंघ (ETV Bharat)

पालघर Lok Sabha Election 2024 : पालघर लोकसभा मतदारसंघात सरासरी 61 टक्के मतदान झालंय. यावेळी मतदान करण्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असला, तरी मतदार यादीतील सुमारे दीड लाख लोकांची नावं गायब असल्याचं उघडकीस आलंय. नवमतदार उत्साहानं मतदानासाठी आले होते. पण यावेळी मतदार याद्यांमध्ये गंभीर दोष आढळले. त्यामुळं मतदार याद्यांच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीये.


नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघातील तब्बल दीड लाख मतदात्यांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केलाय. नालासोपारा मतदारसंघातून 1 लाख 9 हजार 69, तर बोईसर विधानसभा मतदारसंघातून 55 हजार 332 मतदारांची नावं काढून टाकण्यात आलीय. त्यामुळं पालघर लोकसभा निवडणुकीच्या निकालावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. निवडणूक यंत्रणांचा निष्काळजीपणा आणि डोळेझाक या सगळ्याला कारणीभूत असल्याचं मत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी व्यक्त केलंय.

बहुजन विकास आघाडीचा रडीचा डाव : मतदार यादी अद्ययावत करताना निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष आणि मतदात्यांना कल्पना देण्यात येत असते. त्यानुसार आपण सुचविलेल्या दुरुस्ती झाल्या आहेत किंवा नाहीत, याची पडताळणी करण्याची जबाबदारी राजकीय पक्ष अथवा मतदारांचीच असते. परंतु, बहुतांश वेळा ही जबाबदारी ते योग्यपद्धतीनं पार पाडत नाहीत. परिणामी सदोष नावं काढून टाकण्यात किंवा वगळण्यात येतात. अशा चुका कोणी जाणीवपूर्वक करत नाही. त्यामुळं बहुजन विकास आघाडीनं केलेल्या आरोपात तथ्य नाही. किंबहुना त्यांचा हा रडीचा डाव आहे, अशा शब्दांत शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी बहुजन विकास आघाडीच्या अज्ञानपणाची खिल्ली उडवली.


उशिरापर्यंत मतदान सुरू : डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केलं. त्यामुळं मतदान बंद होण्याच्या वेळेनंतरदेखील जवळपास तीनशेच्या आसपास मतदार रांगेत उभे होते. मतदान केंद्राध्यक्षांनी चिठ्ठ्या वाटून सर्वांचं मतदान करून घेतलं. यासाठी मतदानाच्या वेळेनंतरसुद्धा दोन तासाचा अवधी लागला. वाघाडी मतदार केंद्रावर अनेक नागरिक मतदानासाठी उभे होते. पण रांग मोठी असल्यानं अनेक मतदार कंटाळून पुन्हा घरी परतले.

अनेक मतदान केंद्रांवर सुविधांचा अभाव : धरमपूर येथील मतदार केंद्रावर सकाळपासूनच मतदानाचं काम संथ गतीनं सुरू होतं. तसंच तिथं पाण्याची किंवा मतदानासाठी सावलीसाठी तंबूचीदेखील व्यवस्था नव्हती. त्यात विजेचा पुरवठा नसल्यानं बॅटरीच्या उजेडात मतदानाचं काम सुरू होतं. यामुळं मतदार त्रस्त होते. पालघर तालुक्यातील सफाळे येथील दातीवरेमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडले होते. डहाणू तालुक्यातील काही बूथवर लाईट आणि इतर समस्यांमुळं आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं काही ठिकाणी इलेक्ट्रिक पोल पडले. त्यामुळं विजेचा लपंडाव सुरू होता.

हेही वाचा -

  1. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ६०.०९ टक्के मतदान, महाराष्ट्रात किती मतदान झाले? - voter turn out in fifth phase
  2. गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकरी पोहोचले मतदान केंद्रावर; नेमकं काय घडलं? - Lok Sabha Election 2024
  3. संथगतीनं मतदानाचा विरोधकांचा आरोप; "मतदान प्रक्रिया योग्यच", निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.