ETV Bharat / state

Lok Sabha Election 2024 :पंतप्रधानांच्या नावावरच निवडणुका लढवायच्या, तर शिंदे, पवारांना जास्त जागा का द्यायच्या ; 'संघा'चा भाजपा पक्षश्रेष्ठींना सवाल ?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 2:10 PM IST

Lok Sabha Election 2024
संपादित छायाचित्र

Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटला नाही. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये संभ्रम तयार होत आहे. मात्र "आगामी लोकसभा निवडणूक 2024 ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर लढवण्यात येणार आहे. मग शिवसेना आणि राष्ट्रवादीला इतक्या जागा का द्यायच्या," असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपाला विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नाही, असं चित्र सध्या दिसत आहे. दिल्लीतील केंद्राचं नेतृत्व असो किंवा राज्यातील भाजपा पक्ष श्रेष्ठींचा अहवाल. याबाबत अनेक बैठका होऊन सुद्धा अद्याप महायुतीच्या जागा वाटपात शिंदे, पवार गटाला किती जागा द्यायच्या ? याबाबत संभ्रम कायम आहे. त्यातच आता जागा वाटपाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी आक्षेप घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

जागा वाटपाबाबत 2 ते 3 दिवसात अंतिम निर्णय : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मागच्या आठवड्यात महाराष्ट्र, मुंबई दौऱ्यावर असताना महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेल, अशी शक्यता वर्तवली गेली होती. परंतु इतके दिवस उलटून सुद्धा अद्याप महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. यातून तोडगा निघत असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यामध्ये उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार गटाचे खासदार पंतप्रधान मोदी यांच्या नावावर निवडून येणार असतील, तर त्यांना विनाकारण जास्त जागा का द्यायच्या? असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. परंतु या मुद्द्यावर उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. कर्नाटक दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, "याबाबत येत्या दोन ते तीन दिवसात अंतिम निर्णय घेतला जाईल." परंतु अंतर्गत बाबीवर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

शिवसेनेनं 5 ते 6 खासदारांचे चेहरे बदलावेत : राज्यात महायुतीच्या जागा वाटपात भाजपा 32 ते 35 जागांवर निवडणूक लढवणार असून उर्वरित जागा शिंदे, पवार गटाला दिल्या जाणार आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या गटाला 10 ते 12 आणि अजित पवार गटाला जेमतेम 4 ते 5 जागा देण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशा परिस्थितीत सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटानं जास्त जागांची मागणी केल्यास त्यांना जास्तीच्या जागा देण्यात येऊ नयेत. असा पवित्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांनी घेतल्याचा दावा या सूत्रांनी केला आहे. जागा वाटपाबाबत अनेकदा महायुतीच्या बैठका झाल्या. यामध्ये प्रत्येक पक्षानं आपल्या उमेदवाराची जिंकण्याची क्षमता, मतदार संघावर असलेला प्रभाव, विद्यमान खासदारानं मतदार संघात केलेली कामे आणि त्यांची लोकप्रियता. या सर्व बाबींचं सर्वेक्षण केल्यानंतर उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. यामध्ये अनेक विद्यमान खासदारांना डच्चूसुद्धा दिला जाऊ शकतो. त्याच प्रकारे एकनाथ शिंदे यांनी त्यांचे 5 ते 6 विद्यमान खासदारांचे चेहरे बदलावेत, असा पवित्राही भाजपाच्या सर्वेक्षणात घेतला गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचं टेन्शन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे.

'कमळावर' देशभरात जास्तीत जास्त खासदार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी भाजपानं देशभरात कंबर कसली आहे. अबकी बार 400 पार आणि त्यात फक्त भाजपा 370 हे समीकरण भाजपानं आखलं आहे. कमळ या भाजपाच्या चिन्हावर देशभरात जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. मागच्या दहा वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभरातील वाढती लोकप्रियता आणि त्यांनी केलेली विकासकामं पाहता मोदींच्या नावावरच जनता मतं देणार आहेत. असा भाजपाचा कयास आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यात एकनाथ शिंदे यांच्या विद्यमान खासदारांपैकी काही खासदारांना उमेदवारी दिली गेल्यास ते निवडून येतील की नाही? याची शाश्वती नाही. तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपाला सुद्धा शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या जागेवर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धोका पत्करण्यापेक्षा त्या जागेवर भाजपाचाच उमेदवार उभा केल्यास किंवा महायुतीचा उमेदवार भाजपाच्या कमळ चिन्हावर उभा केल्यास ती जागा सहजपणे जिंकून आणता येईल आणि संसदेमध्ये सुद्धा भाजपाच्या खासदारांची संख्या वाढेल. याकरता ही रणनीती सुद्धा आखली जात आहे. हाच मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पुढं आणला असल्यानं या कारणानं आता महायुतीच्या जागा वाटपाबाबत विलंब होत असल्याचीही चर्चा सुरू आहे.

भाजपा हा शिस्तीचा पक्ष : याबाबत आरएसएसचे पदाधिकारी बोलायला तयार नाहीत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क केला असता त्यांनी येत्या दोन-चार दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं. मात्र, आरएसएसचं नाव काढू नका, असं सांगत बोलण्यास नकार दिला. दरम्यान, भाजपा हा शिस्तीचा पक्ष मानला जातो. भाजपासाठी आरएसएस ही सर्वोच्च संस्था असल्यानं त्याबाबत प्रतिक्रिया देण्यास भाजपाचे नेते धजावत नसल्याचं चित्र आहे.

हेही वाचा :

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.